यवतमाळ : चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये दारू बंदी उठवण्यासाठी जिवाचं रान करणारे मंत्री विजय वडेट्टीवार खरंच काँग्रेसी आहेत काय ? काँग्रेस विरोधी विचारसरणी बाळगणाऱ्या मंत्र्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी व सवाल स्वामिनी जन आंदोलनाचे नेते महेश पवार यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून विचारला आहे.
महात्मा गांधी दारूला प्रखर विरोध करायचे. ते म्हणायचे 'मला एका तासासाठी हुकूमशाह केले तर मी सर्वप्रथम दारू दुकाने बंद करेल ' मात्र या विचारांना छेद देत काँग्रेसचे आमदार तथा राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार उठ सूट दारूबंदी उठवण्याची भाषा करतात.
ते फक्त इथेच नाही थांबत नाहीत तर गांधीवादी अभय बंग व त्यांच्या परिवारावर व्यक्तिगत टीका करतात अशा गांधी विचार विरोधी नेत्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकले पाहिजे. काँग्रेस पक्षाची बदनामी विजय वडेट्टीवार करीत आहे याकडे सोनिया गांधींनी प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. नाहीतर काँग्रेस पक्षांनी आपल्या पक्षाचे ध्येयधोरण बदलवली पाहीजे.
वडेट्टीवार म्हणतात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली, इथे अवैद्य दारू मोठ्या प्रमाणात मिळत आहे, क्राईम वाढला, नकली दारू येत आहे असे आरोप वडेट्टीवार करतात . विजय वडेट्टीवार यांनी मुक्तीपथ सारख्या व्यसनमुक्तीच्या यशस्वी प्रयोगावर सुद्धा टीका केली. यामध्ये १४ कोटी रुपये सरकारचा खर्च झाला. बंगांनी अनुदान घेतले तरी प्रभावी अंमलबजावणी झाली नाही असे ते म्हणतात.
मात्र शिवानी दूध प्रकल्पात केंद्र सरकारचे आणि बँकांचे पैसे कुठे गेले ? यावर ते उत्तर देणार नाहीत . पालकमंत्री म्हणून अडचणी सोडविणे ही जबाबदारी त्यांची असावी उलटपक्षी दारूबंदी उठविणे हा पर्याय त्यांनी निवडला असून त्यांनी त्यांची विचारसरणी दाखविली आहे . आपला नाकर्तेपणा मान्य करून वडेट्टीवार पालकमंत्री पदाचा राजीनामा का देत नाहीत? आपत्ती निवारण खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार हे स्वतः चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याचे मोठी आपत्ती आहे. त्यामुळेच त्यांना यापुर्वी दारुप्रचार मंत्री करा अशी टीका महेश पवार यांनी केली होती .
उघडपणे दारूला समर्थन आणि दारू सुरू करण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न हे धाडस वडेट्टीवार कुणाच्या भरोशावर करीत आहे. याचा जर मुख्यमंत्र्यांनी तपास केल्यास यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येईल. याची जनमानसात चर्चा आहे. त्यामुळे फक्त काँग्रेसच नाही तर महाआघाडीचे विश्वसनीयता देखील धोक्यात आहे .
जर दारूबंदी फसली असेल तर तिला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा आपली नैतिक जबाबदारी समजून पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेची दिशाभूल करू नये.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.