water crisis in 600 villages in yavatmal district
water crisis in 600 villages in yavatmal district

यवतमाळ जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा; तब्बल सहाशे गावांचा टंचाई आराखड्यात समावेश

यवतमाळ : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला दोन मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. यंदाच्या टंचाई आराखड्यात जिल्ह्यातील 589 गावांचा समावेश आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यातील दोन गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांत तीन टॅंकरची वाढ झाली असून पाच टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे अजून तरी टंचाईने डोके वर काढलेले नाही. मात्र, जसजसा उन्हाळा तापणार तसतसे टंचाईचे चटके बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी टंचाई असते. या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. यंदाही जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. 

टंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे. यंदा पहिला टप्पा निरंक आहे. दुसरा टप्प्यात जानेवारी ते मार्च या दरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची सुरुवात झाली आहे. पुसद तालुक्‍यातील खंडाळा, लोहारा खुर्द, बुटी, लोहारा ईजारा, सावरगाव या पाच गावांसाठी टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या आठ हजार 918 नागरिकांची तहान भागविली जात आहे. दहा फेऱ्यांने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 

यंदाच्या आराखड्यात सर्वाधिक खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा एप्रिल ते जून या दरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 172 गावांचा समावेश आहे. यातील दोन गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात तीन टॅंकर वाढले आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात तब्बल 453 गावांना टंचाईचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. या गावांसाठी 453 उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, दोन कोटी 27 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

यंदा 589 गावात पाणीटंचाईची शक्‍यता आहे. यासाठी 636 उपाययोजना राबविण्यात येणार असून, सात कोटी 80 लाख 33 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उपाययोजनामध्ये विंधन विहीर कार्यक्रम, तात्पुरती पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, सिंचन विहीर विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढणे, टॅंकर आदीचा समावेश आहे.

विहीर अधिग्रहण निरंक

जिल्ह्यात सात कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यात खासगी विहीर अधिग्रहणाची संख्या अधिक आहे. त्यानंतर 21 टॅंकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. सध्या पाच टॅंकर सुरु करण्यात आले आहे. मात्र, विहीर अधिग्रहण निरंक आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com