राजीनाम्यानंतर संजय राठोड सध्या काय करतात?

What is Sanjay Rathore doing now after his resignation Yavatmal political news
What is Sanjay Rathore doing now after his resignation Yavatmal political news

यवतमाळ : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आणि भाजप चांगलेच चवताळले. हे सरकार लवकरच पडेल, पाच वर्षे सरकार चालणार नाही, अशा भविष्यवाणीला सुरुवात झाली. पाहता-पाहता सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या काळात धनंजय मुंडे, संजय राठोड व अनिल देशमुख हे तीन मंत्री वादामुळे चर्चेत आले. मात्र, या वादाचा सर्वाधिक फटका बसला वनमंत्री संजय राठोड यांना. विरोधकांच्या दबावामुळे राज्य सरकारची राठोड यांच्या रूपात पहिले विकेट पडली. विजयानंतर आनंद व्यक्त करण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आलेले राठोड वादामुळेही चांगलेच चर्चेत होते. मात्र, पद गेल्यानंतर ते काय करीत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. हेच आपण माहिती करून घेणार आहोत...

राज्याचे माजी वनमंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके करत तरी काय आहेत, असा प्रश्न जनतेला पडला आहे. संजय राठोड आता आपल्या दारव्हा-दिग्रस-नेर मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ते नेहमीप्रमाणे अधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. त्यांच्या निधीतून मंजूर केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करीत आहेत. आमदार असताना ते ज्याप्रमाणे मतदारसंघात फिरत त्याचप्रमाणे त्यांनी आता पुन्हा सुरू केले आहे.

टीकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध जोडून आरोप प्रत्यारोप झालेत. महाराष्ट्रातील इतर विषय बाजूला सारून विरोधकांनी ते प्रकरण ताणून धरले होते. अखेर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी संजय राठोड यांनी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या परिस्थितीशी सामना करीत संजय राठोड यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

रविवारी (ता. १४ मार्च) दिग्रस तालुक्यात संजय राठोड यांचा दौरा होता. येथील विश्रामगृह येथे ते कार्यकर्त्यांशी बोलले. लोकांच्या समस्या ऐकून घेत रेंगाळलेले कामे मार्गी लावले. त्याचबरोबर नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांसोबत संवाद साधून गावाच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करा विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. सोमवारी जिल्ह्यात, मुख्यालयी मंगळवार व बुधवार मुंबई, गुरुवार, शुक्रवार व शनिवार मतदारसंघात दौरा असा त्यांचा साप्ताहिक कार्यक्रम आहे.

नागरिकांच्या भेटी घेऊन अडीअडचणी व समस्या ऐकून निराकरण करणे सुरू केले आहे. १८ मार्चला नेर नबाबपूर येथील मुस्लिम कब्रस्थान येथील संरक्षण भिंत या कामाचे भूमिपूजन केले. नेर येथील विश्रामगृहावर दोनदा भेट देऊन कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नेर भेटीत नगरपालिकेच्या विकासकामांचा आढावा घेतला. दारव्हा तालुक्यात दोनवेळा कार्यकरतर्यांच्या भेटी घेतल्या. अधिकाऱ्यांशी संवाद साधून विकासकामांचा आढावा घेतला. धामणगाव देव व दारव्हा येथील मुंगसाजी महाराज देवस्थानात आरती केली. त्यानंतर अधिकऱ्यांची आढावा बैठक घेतली.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच मंत्र

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे त्यांची शिकवण ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख सुध्दा आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. मी मागील चार टर्मपासून विधानसभागृहाचा सदस्य आहे. नागरिकांना माझ्या कामाची जाणीव आहे. त्यामुळे ‘तुम्ही मला केव्हाही आवाज द्या, मी लगेच तुमच्या समस्या सोडविण्यासाठी तयार असेल’ असे मत संजय राठोड यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com