गणेश कनाटे म्हणतात, प्रतिभावंतांच्या कवितांचे मूल्यमापन करायचे कुणी? 

नागपूर : रवींद्र लाखे यांना श्रीधर शनवारे स्मृती काव्य पुरस्कार प्रदान करताना अरुणा सबाने, गणेश कनाटे, गिरीश गांधी व कविता शनवारे.
नागपूर : रवींद्र लाखे यांना श्रीधर शनवारे स्मृती काव्य पुरस्कार प्रदान करताना अरुणा सबाने, गणेश कनाटे, गिरीश गांधी व कविता शनवारे.

नागपूर  : रवींद्र लाखे यांच्या कविता मौलिक असतात. मात्र, कवितांच्या भाऊगर्दीत त्यांच्या प्रतिभेचे मूल्यमापन कोणी करावे, हाच प्रश्‍न आहे. दुर्दैवाने असे समीक्षक मराठी वाङ्‌मयीन क्षेत्रास लाभले नाहीत. त्यामुळे अनेक प्रतिभावंतांच्या रचनांचे समीक्षणच झाले नसल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांनी व्यक्‍त केली. 
आकांक्षा प्रकाशन व शनवारे कुटुंबीयांतर्फे देण्यात येणारा श्रीधर शनवारे स्मृती काव्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांच्या हस्ते रवींद्र लाखे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्‍वस्त गिरीश गांधी होते. कार्यक्रमाला दै. सकाळचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर आकांक्षा प्रकाशनच्या अरुणा सबाने, डॉ. कविता शनवारे, प्रा. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. कनाटे म्हणाले की, एकविसाव्या शतकात अनेकांनी कविता लिहिल्या. पण, कवी ग्रेस यांच्यासह मर्ढेकर, आरती प्रभू यांच्या कवितांचे समीक्षणच झाले नाही. काव्यक्षेत्रात अनेक प्रतिभावंत असले, तरी श्रेष्ठ कोण, हे ठरविणारे समीक्षक गरजेचे आहेत. याच कारणामुळे उथळ व फालतू गोष्टीत कवितेचे विश्‍व अडकले आहे. 
रवींद्र लाखे यांच्या कविता अस्वस्थ करणाऱ्या असल्याचे मत शैलेश पांडे यांनी व्यक्‍त केले. त्यांच्या कवितांमध्ये चिंतनाची भूक असते. कधी त्यात प्रश्‍न विचारलेले असतात, तर कधी वाचल्यानंतर वाचकास प्रश्‍न पाडणाऱ्या असतात. काही कविता भविष्याचा वेध घेणाऱ्या तर काही भूतकाळातील खाणाखुणा शोधण्यास भाग पाडत असल्याचे शैलेश पांडे म्हणाले. 
रवींद्र लाखेंच्या कवितेतून जगण्यातला अतर्क्‍य भाव जाणवतो. म्हणूनच ती वाचकाच्या अंत:करणाला भिडते. ही कविता शब्दात कुठेही अडकवत नसली तरी ती आशयातून आपल्याला भेटायला येते, असे सांगताना लाखेंच्या कविता जीवनातील विविधतेला शैलीदार अभिव्यक्‍ती प्रदान करणाऱ्या असतात, असे समीक्षण शैलेश पांडे यांनी केले. 
मनोगतात काय बोलू, उपस्थितांनी ते सारे मांडले. मी श्रीधर शनवारे यांच्या फार जवळ होतो. वाङ्‌मयबाह्य कृतीत शनवारे कधीच नव्हते. ते व त्यांची कविता असेच त्यांचे विश्व होते, असे मत रवींद्र लाखे यांनी व्यक्‍त केले. तसेच मी कविता आनंदी होण्यासाठी वाचतो, जे संदर्भ आठवतील ते हृदयात साठवून ठेवत असल्याचे मनोगत गिरीश गांधी व्यक्‍त केले. प्रास्ताविक आकांक्षा प्रकाशनाच्या अरुणा सबाने व संचालन रेखा दांडिगे घिया यांनी केले. आभार डॉ. सुजला देसाई शनवारे यांनी मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com