अचलपूर (जि. अमरावती) ः संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे राज्यासह मेळघाटातील शाळा बंद आहेत. परिणामी यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली नाही. मात्र मेळघाटातील काही उच्चशिक्षित बेरोजगार युवक-युवती आपापल्या गावात चार-पाच मुलांना एकत्र करून शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम मात्र सुरूच आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळल्या जात आहे.
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. सोबतच बहुतेक गावांत इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेणेही शक्य नव्हते. मात्र चिखलदरा तालुक्यातील जवळपास 830 च्यावर उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी पुढाकार घेत आपापल्या गावातच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी होण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे शिक्षकमित्र म्हणून एक छदामही न घेता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. यामुळे पालकसुद्धा समाधान व्यक्त करीत आहेत. सध्या गावागावांत शिक्षकमित्र चिमुकल्यांना झाडाखाली, स्वत:च्या घरात वा समाजमंदिरात वर्ग भरवित आहेत.
यामध्ये मंगल भुता चतुर, सज्जू कासदेकर, हिराय धिकार, शिवलाल जामूनकर, रोशनी राघोजी येवले, लक्ष्मी कासदेकर, रवीना धुर्वे, लालबा कासदेकर, अक्षय धिकार, अजय धिकार, मावस्कर, उईके यांच्यासह जवळपास 830 शिक्षकमित्र पहिली ते दहावीपर्यंत शिकवित आहेत. यासाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळूसे, संदीप बोडके यांचे उपक्रमाला सहकार्य लाभत आहे.
मेळघाटात शाळा बंद असतानाही उच्चशिक्षित युवक- युवतींनी पुढाकार घेतल्याने आज विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन मिळत आहे. मात्र या शिक्षकमित्रांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक मदत करण्यात येत नाही. विशेष म्हणजे शाळेचे शिक्षकही बेरोजगार शिक्षकमित्रांना मदत करण्यासाठी पुढे येत नाही. कोरोनाचे संकट त्यात बेरोजगार, असे असतानाही मनाचा मोठेपणा दाखवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना ज्ञानार्जन देत आहेत. दरम्यान, शिक्षकांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या वेतनातून आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. जेणेकरून बेरोजगार शिक्षक मित्रांना कोरोनाच्या संकटात संसाराचा गाडा हाकण्यासाठी मदत होईल.
चिखलदरा तालुक्याच्या शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गावातीलच शिक्षित युवक-युवतींमधून शिक्षकमित्रांनी पुढाकार घेत स्वत:च्या घरात, झाडाखाली, समाजमंदिरात प्रत्येक चार ते पाच विद्यार्थ्यांना ते दहावीपर्यंत धडे देत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळल्या जात आहे.
-संदीप बोडखे
विस्तार अधिकारी
पं. स. चिखलदरा.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.