नवेगावबांध (गोंदिया) : सरकारने नाटक सादर करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीचे मुख्य केंद्र असलेल्या देसाईगंज वडसा येथील नाट्यमंडळाची कार्यालये गेल्या सोमवारपासून बुकिंग करता खुली झाली आहेत. सात महिन्यांपासून बंद पडलेल्या झाडीपट्टीतील रंगमंचाचा पडदा येत्या भाऊबीजेपासून म्हणजे 16 नोव्हेंबरपासून उघडणार आहे.
वडसा येथील सर्व प्रमुख नाट्यमंडळांकडे दीडशे ते दोनशे नाट्यप्रयोगाचे बुकिंग सुद्धा झाली असल्याची माहिती आहे. पूर्व विदर्भात विखुरलेले त्या-त्या नाट्यमंडळाचे कलाकार वडसा येथे डेरेदाखल झाले आहेत. सध्या जुन्याच नाटकाचे बुकिंग सुरू आहे. त्या मंडळाचे कलाकार आपल्या गाजलेल्या नाटकांच्या तालिमीत व्यस्त आहेत. नव्या नाटकाच्या तालमीला वेळ मिळाली नाही म्हणून सध्या जुनीच नाटके सादर केली जाणार आहेत. पुढील वर्षी जानेवारीपासून नवी नाटके रंगमंचावर सादर करण्यात येतील. नव्या नाटकाच्या तालमीदेखील लवकरच सुरू होणार आहेत. या रंगभूमीकडे शहरी कलाकार आर्थिक स्रोत म्हणून या रंगभूमीकडे बघतात. त्यामुळे पुणे, नागपूर, मुंबई येथील काही मराठी चित्रपट व नाट्यकलावंतांनी झाडीपट्टी रंगभूमीकडे आपला मोर्चा वळविला आहे.
खुल्या जागेत नाटके करण्याची परवानगी शासनाने पाच नोव्हेंबरला दिली आहे. 50 टक्केची अटही घालण्यात आली आहे. नाटकाची बुकिंग करतानाच सोशल डिस्टन्सची अट स्थानिक मंडळावर टाकण्यात आली आहे. नियम पालनासाठीची जबाबदारी स्थानिक मंडळावर टाकण्यात येत असल्याची माहिती झाडीपट्टी नाट्य अकादमीचे माजी अध्यक्ष व नाट्यकलाकार हिरालाल पेंटर यांनी सांगितले.
झाडीपट्टीतील म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या पूर्व विदर्भात भाऊबीजेपासून मंडया भरत असतात. ज्या गावात मंडई असेल तर हमखास नाटक असतेच. परंतु, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून झाडीपट्टी रंगभूमी पूर्णतः विस्कळीत झाली होती. लॉकडाउनमुळे अनेक नाट्यकलावंत, वेशभूषाकार, रंगमंच कार, हार्मोनियम, तबला, ऑर्गन वादक यांचा रोजगार हिरावला गेला होता. त्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली होती. कलावंत, कारागिरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला होता. हे विशेष. आता मंडई भरविण्यासाठी व नाटकांच्या आयोजनासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग व जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतात? याकडे नाट्यरसिकांचे लक्ष लागले आहे.
शासनाने नाटकाला परवानगी देताना ज्या अटी शर्ती घातल्या आहेत, त्याच झाडीपट्टी रंगभूमीला मारक आहेत. शहरी रंगभूमीपेक्षा झाडीपट्टी रंगभूमी वेगळी आहे. आपली नाटक खुल्या रंगमंचावर होतात. त्यामुळे अटी जाचक ठरतात. नाटक कंपन्याचे रेट वाढले आहेत, त्यामानाने तिकिटाचे रेट वाढवले तर प्रेक्षक नाटक पाहायला येणार नाही. त्याचा फटका स्थानिक आयोजक मंडळांना बसेल. पन्नास टक्क्यांच्या अटीचे पालन करणे शक्य नाही. त्यामुळे नाटकाला आवश्यक प्रेक्षक मिळणार नाहीत. त्याचा आर्थिक फटका स्थानिक मंडळांना बसेल. त्यामुळे शासनाने याची जबाबदारी स्थानिक मंडळावर सोडावी.
-डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ नाट्य कलावंत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.