शून्याची गडबड..! लाखो शेतकऱ्यांची बिघडली गणितं! 

money
money

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं झालं. अगदी शेवटच्या टप्प्यात हाती येणारं पीक डोळ्यांदेखत आडवं झालं. नशिबाची क्रूर थट्टा अन्‌ निसर्गाच्या उलट चक्रानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अतिवृष्टीपेक्षाही मोठा आसवांचा पूर आला. गाठीशी असलेली सारी जमापुंजी शेतात लावल्याने खिसा रिकामा झालेल्या बळीराजाला प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या रकमेची आस होती. मात्र, शासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे तेथेही शून्याची भानगड झाली, अन्‌ पुरत्या बिघडलेल्या गणिताने शेतकऱ्यांच्या वेदनांवर जणू रहाटेच हाणले. 

पंतप्रधान किसान सन्मान योजना 
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपये याप्रमाणे प्रत्येकी तीन हप्ते अशा टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम टाकली जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वी योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला.

यंत्रणेची चुक
आतापर्यंत राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे चार हजार रुपये जमा झाले. पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही हप्ता जमा झालेला नाही. यामुळे नेमकं काय होतय हा प्रश्न होता. यासंदर्भात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाच्या या योजनेची जी संबंधित यंत्रणा अंमलबजावणी करीत आहे, त्यांच्या एका चुकीमुळे लाखो शेतकऱ्यांची गणितं बिघडली. 

शून्याऐवजी पडला "ओ' 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची हक्काची बॅंक म्हणून ओळखली जाते. बहुतांश 90 टक्के शेतकऱ्यांचे खाते याच बॅंकेत आहेत. अशात केंद्राच्या यंत्रणेकडून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे रुपयांचे हस्तांतरण करताना आयएफएससी कोडमध्ये शून्यच्या ऐवजी इंग्रजीतील "ओ' वापरला गेला. यामुळे संबंधित रक्कम बॅंकेकडे आली नाही. आता याचा थेट फटका बळीराजाला बसत आहे. 

वर्षभरापासून दमडीही नाही 
ज्या शेतकरी बांधवांनी राष्ट्रीयकृत बॅंकेचे खाते जोडले होते, त्यांच्या खात्यात आतापर्यंत योजनेच्या दोन हप्त्याचे चार हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, मध्यवर्ती बॅंकेचे खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरापासून एक दमडीही जमा झाली नाही. केवळ शुल्लकशा चुकीमुळे लाखो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. यावर प्रशासन नेमके काय करीत आहे, हा संतप्त सवाल आता शेतकरी विचारू लागले आहेत. 

खरे शेतकरीच योजनेपासून दूर 
कर्जमाफीच्या वेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली होती. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "आम्ही राज्यातील खरे शेतकरी शोधले आहेत' असे विधान केले होते. आता मात्र या खऱ्या शेतकऱ्यांनाच सन्मान योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. 

गंभीर स्थिती 
राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे बळीराजाची कंबर मोडली आहे. उभे पीक आडवे झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. जवळचा संपूर्ण पैसा शेतीत लावल्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे तो पुरता ढासळला आहे. अशात एक-एक रुपया महत्त्वाचा असताना पंतप्रधान किसान सन्मान योजनेकडे तो आशेने बघत होता. पण इथेही त्याची घोर निराशाच झाली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com