‘पॉवर’ पॉइंट : सतत ‘मनमोकळेपणा’ हवाच कशाला?

एक प्रश्न विचारल्यावर ५० वाक्यांत उत्तरं देणारे लोक जगात कमी नाहीत; आणि हे नकारात्मक नाही तर अगदी न्यूट्रल राहून मी सांगत आहे.
Openless
OpenlessSakal

एक प्रश्न विचारल्यावर ५० वाक्यांत उत्तरं देणारे लोक जगात कमी नाहीत; आणि हे नकारात्मक नाही तर अगदी न्यूट्रल राहून मी सांगत आहे. काही वेळा खूप माहिती देण्याचा उत्साह असतो, काही वेळा स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड, काही वेळा नातं घट्ट करण्यासाठी पहिलं पाऊल.. इच्छा यातली कुठलीही असू शकते. अगदी काही जणांच्या मनातून, खोल खोल आतून उमटत असतात शब्द. आपला प्रश्न, त्याचं नेमकं उत्तर, केव्हाचंच मागे पडलेलं असतं. कदाचित आपला प्रश्नही नसतो काही. पण ते बोलत असतात. भरभरून... उत्स्फूर्तपणे.. असे लोक आयुष्यात लाभणं खरंतर भाग्यच..

माझी तशीच एक मैत्रीण. असं का? विचारल्यावर केव्हापासून, कधी, कसं सगळं घडाघडा बोलायची. आताशा बोलत नाही तेवढी. मलाच चुकल्याचुकल्यासारखं झालं. भले मी चार वेळा तोंडावर दुर्लक्ष केलं तरी बोलत राहायची ती. किंबहुना मी दुर्लक्ष करावं आणि तिनं बोलत राहावं. मग शेवटी मलाच चार वाक्यं सुनावून संभाषण थांबणार याची मला आणि तिलाही खूप खूप सवय झाली होती; पण आता मी दुर्लक्ष केल्यावर लगेचच कशी काय शांत बसली याचा विचार करता करता ती म्हटली, ‘‘काही वेळा खूपच जास्त व्यक्त होते ती. ठेचकाळल्यावर कळलं.’’

क्षणभर माझाच मला राग आला. अशा कित्येक वेळा गेल्या होत्या, जेव्हा मी तिचं व्यक्त होणं अक्षरश: गृहीत धरलं होतं. अर्थात तिचं बदलणं माझ्यामुळे नव्हतं हे कळत होतं मला; पण प्रवाहाच्या रेट्यानं हलवायला पाण्याचा प्रत्येक थेंब कारणीभूत असतोच की!

काही वेळा नको तेवढं व्यक्त केलं जातं, तेव्हा आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत असतो का? सगळं कसं तोलून मापून होईल? संवादासाठी टाकलेल्या पावलाला अंतर राखणं कसं शिकवणार? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात मग गर्दी केली.

मग वाटून गेलं, की ‘कुणासमोर’ व्यक्त होतोय, हे खासकरून आजच्या काळात फार फार महत्त्वाचं झालं आहे. हल्ली नात्यांमध्येही ‘नकोसंपण’ इतकं रुजलंय, की एकमेकांची दहा अधिक वाक्यं ऐकणाऱ्या व्यक्ती हाताच्या बोटांवर मोजाव्या इतक्या राहिल्या आहेत. भरभरून व्यक्त होताना नकळत प्रतिसादाची अपेक्षा असतेच. हा प्रतिसादच हल्ली हल्ली थंडावलेला असतो. आपापल्या कोषात गुरफटलेल्या व्यक्तीसमोर आपला बोलघेवडेपणा विदूषकी ठरतो. यात बोलघेवड्या व्यक्तीची चूक नसतेच मुळी. पण शेवटी बदलली माझी मैत्रीणच ना!

आता तिला कसं सांगावं, की तू आहे तशीच राहा म्हणून. असं होत नाही हल्ली. अगदी मोजून मापून शक्य नाही; पण आजच्या काळात खूप जवळची एखाद दुसरी व्यक्ती सोडल्यास स्वल्पविराम, पूर्णविराम आधीच ठरवलेले बरे. काही जण म्हणतील याला संवाद कृत्रिम करणं म्हणतात. पण मला वाटतं यानं किमान संवाद टिकतो तरी..

सगळ्याच आपल्या अतिशय जवळच्या व्यक्ती नसतात. आणि त्यामुळे सगळ्यांबरोबर मोकळेपणा नसतो. काहींबरोबर फक्त ‘बोलणं’ असतं, काही व्यक्तींचं फक्त ‘ऐकणं’, तर काहींबरोबर थोडी वरची पायरी म्हणजे ज्याला ‘संवाद’ म्हणून शकतो. पण मोकळेपणा, दिलखुलास गप्पा, ही अगदी ठराविक लोकांबरोबच घडणारी गोष्टय. ती सरसकट सगळ्यात संभाषणात आणायची असेल तर कधी कुठल्या तरी पातळीवर कुणी तरी आपल्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता काय मनात ठेवली पाहिजे. असं काहीतरी मैत्रीण सांगत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com