
मी अगदी एका राजकीय घराण्यातीलही स्त्रीच्या संघर्षाचं उदाहरण बघितलं आहे. घरात नवऱ्यालाही बायको आपल्यापेक्षा जास्त उच्चपदाला पोचलेली नको असते.
- कांचन अधिकारी
‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ ही खूपच जुनी; पण तितकीच सत्य उक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल, की कांचनताई, यात तुम्ही नवीन ते काय सांगितलंत? नवीन एकच गोष्ट वाटले मला, की आत्ता आपण स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव पार करूनसुद्धा स्त्रीला कसं बंधनात ठेवलं जातंय, तिचे पंख कसे छाटले जात आहेत याची काही जिवंत उदाहरणं आजही दिसतात.
मी अगदी एका राजकीय घराण्यातीलही स्त्रीच्या संघर्षाचं उदाहरण बघितलं आहे. घरात नवऱ्यालाही बायको आपल्यापेक्षा जास्त उच्चपदाला पोचलेली नको असते. त्याच्या पुरुषी, अहंकाराला ठेच पोचते. मग तोच तिच्या विरोधात कारवाया सुरू करतो. लोकांसमोर दाखवण्याचे दात वेगळे असतात आणि खायचे वेगळे असतात. तिनं आकाशात स्वकर्तृत्वावर उंच भरारी मारली, की तिचे पंख छाटण्यात येतात.
स्त्री कितीही उच्च पदाला पोचली, तरी तिला तिच्या घराच्या उंबरठ्याच्या आत दबूनच जगावं लागतं, तशीच अपेक्षा केली जाते. कधी काही वाटतं, करिअर करणाऱ्या स्त्रीनं लग्नच करू नये का? कारण career & marriage does not go hand in hand. तुम्हाला वाटेल, मग तुम्ही नाही का करिअर केलंत? केलं ना! सुरवातीलाच मलाही घरातून हेच सांगण्यात आलं, की काय गरज आहे तुला हे सर्व करायची? चांगला सुखानं संसार कर ना!
मला हे कळायचं नाही, की मी करिअर केलं तर मी संसार चांगला करू शकणार नाही असं का वाटावं? पण त्याच्या आत दडलेलं खरं इंगित हे असतं, की न जाणो हिला सक्सेस मिळाला, हिचं नाव मोठं झालं, हिला चार लोक ओळखायला लागले तर! ही माझ्या पुढे गेली तर! मग समाज मला म्हणेल, ‘अरे, तुझी बायको तर तुझ्याही पुढे गेली. ती खूप हुषार आहे.’ मग? मग आली का पंचाईत? यासाठीच मग तिचे पाय खेचायला सुरवात होते. स्त्रीला बाहेरच्या क्षेत्रात जेवढा संघर्ष करावा लागनार नाही, त्याहीपेक्षा जास्त संघर्ष (मानसिक) घरात करावा लागतो, हे सत्य आहे.
आज अनेक क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर दिसतात. मग ते राजकारण, समाजकारण, नाट्य, चित्रपट, कला, क्रीडा असो, किंवा अगदी अवकाशातसद्धा भरारी मारत असोत. जे कौतुक, अभिमान त्या मुलीच्या आई-वडिलांना वाटतं, तेच कौतुक तिच्या सासरी तिला मिळतं का?
आजच्या एकविसाव्या शतकातसुद्धा उंच भरारी घेणाऱ्या स्त्रीला हृदयी कितीही अमृत साठवलं, तरी नयनी पाणी आणण्यासाठी अनेक पुरुष तयार असतातच. आजही घरात स्त्रीनं पाच आकडी पगार आणला, तरी घरी परत आल्यावर पदर खोचून कामाला सज्ज उभं राहावंच लागतं. मुलांचं संगोपन उत्तम केलं, त्याला उत्तम नागरिक बनवला, तरी ‘तू तर कायम घराच्या बाहेरच होतीस,’ हेच ऐकावं लागतं. जोपर्यंत स्त्री-पुरुष समानता ही प्रत्येकाच्या मनात (प्रामुख्याने पुरुषांच्या) रुजणार नाही, तोपर्यंत स्त्रीच्या नयनात पाणी येतच राहणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.