टिवटिवाट : अपमाहितीचा बकरा

Sakal-Media
Sakal-Media

सुशांतसिंह राजपूत यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) टीमने जाहीर करून दोन दिवस झालेयत. मुंबई पोलिसांभोवती जाणीवपूर्वक विणलेलं संशयाचं जाळं दूर व्हायला ‘एम्स’च्या रिपोर्टनं काही मदत जरूर होईल. सुशांतच्या मृत्यूला खुनाचं स्वरूप देऊन ट्विटरवर वादळ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत यांनी ‘एम्स’चा निष्कर्ष कसा स्वीकारला, याबद्दल कुतुहूल होतं. आधी घराणेशाही, मग मुंबई पोलिस आणि सरतेशेवटी महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत मिळेल त्या विषयावर टीकाटिप्पणी करणाऱ्या कंगना यांनी ‘एम्स’च्या अहवालानंतर ट्विटरमौन बाळगलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगभरात अनेक ठिकाणी गेली सात वर्षं सातत्यानं अपमाहिती (मिसइन्फॉर्मेशन) प्रसृत करून गोंधळ माजवून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपमाहितीची भारत ही एक प्रमुख बाजारपेठ बनलीय. कारण, जगात लोकशाहीप्रधान देशांमध्ये भारताएवढे इंटरनेट वापरकर्ते अन्यत्र नाहीत. चीनमध्ये इंटरनेटचा सर्वाधिक वापर असला, तरी तिथे सरकारी यंत्रणा ठरवेल तीच माहिती प्रसृत होते. भारतात माहितीचे लोकशाहीकरण आहे आणि ते तसं असलंच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. याच लोकशाहीकरणाचा गैरफायदा उठवणारी व्यवस्थाही भारतात फोफावलीय आणि त्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे सुशांतसिंह प्रकरण.

एखाद्याच्या मृत्यूचं भांडवल करणं राजकारणात नवं नाही; कलाक्षेत्रात जरूर नवं आहे. मृत्यूचं भांडवल करून राज्यकर्त्यांना सोयीची ठरेल अशी अपमाहिती प्रसृत करणाऱ्यांना वेळीच बुरख्याबाहेर काढलं नाही, तर उद्या हा राजकारणाचा द्रुतगती मार्ग बनणार आहे. याच सदरात १९ ऑगस्टला अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठातील स्कूल ऑफ इन्फॉर्मेशनचा उल्लेख होता. या संस्थेत विशेषतः भारतात सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अपमाहितीचा अभ्यास करणारी टीम आहे. जॉयोजित पॉल यांच्या टीमनं सुशांतसिंह प्रकरणातल्या ट्विटचाही अभ्यास केला. ‘‘प्रकरणाला राजकारण्यांनी, विशेषतः भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांनी खुनाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला,’’ असा निष्कर्ष या अभ्यासातून निघाला आहे. (माहितीसाठी लिंक - https://joyojeet.people.si.umich.edu/ssr/).

अभ्यासाचे निष्कर्ष 

  • कटकारस्थान सिद्धांत जन्माला घालण्यासाठी स्थानिक पोलिसांना अकार्यक्षम ठरवलं.
  • राज्य सरकारला घराणेशाहीच्या आरोपाभोवती अडकवलं गेलं.
  • मुस्लिमांविषयी अविश्वासाचं वातावरण तयार करण्याचाही प्रयत्न झाला.
  • केंद्र सरकारबद्दल नकारात्मक असलेल्या कलाकारांना जाणीवपूर्वक ट्रोल केलं गेलं.
  • सुशांतसिंह प्रकरणानं अपमाहितीच्या जाळ्यात अडकवण्याचे सारे प्रयत्न सूत्रबद्धपणे झाले. उघड्या मेंदूनं सोशल मीडियावर वावरणारे वाचले; अन्य वापरकर्ते अपमाहितीचा बकरा बनले, असं ‘एम्स’च्या निष्कर्षातून दिसतं.

सुशांतसिंह प्रकरणानं कुणाला काय साध्य झालं?
राज्यकर्ते : देशातील ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विकेंद्रित करणं.
टीव्ही : प्राइम टाइममध्ये कोरोनापेक्षा वेगळा आशय.
राजकीय नेते : माध्यमांमध्ये झळकण्याची संधी.
बॉलीवूड : जुने हिशेब चुकते करण्याची संधी.

कुणी काय गमावलं...?
मानसिक आजार, खिन्नमनस्कता (डिप्रेशन) भारतात दुर्लक्षित आजार आहे. आत्महत्यांसारखं टोकाचं पाऊल या आजारातून उचललं जाऊ शकतं. याबद्दल सर्वंकष चर्चेची आणि मार्ग काढण्याची संधी भारतानं गमावली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com