टिवटिवाट : ‘सत्य’घ्या पारखून

shagun-chowk
shagun-chowk

व्यक्त होणं ही स्वाभाविक भावना. व्यक्त होण्याची सर्वाधिक संधी दिली सोशल मीडियानं. स्वाभाविक भावनेला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यावर सोशल मीडियातून काय उलथापालथ होऊ शकते, हे अनुभवण्याचा आजचा काळ. हा काळ प्रत्यक्ष (रिअॅलिटी) आणि समज (पर्सेप्शन) यातल्या सीमारेषा अत्यंत धूसर असण्याचा. या धूसर सीमारेषांमुळं समजुतीचे घोटाळे हरेक क्लिकवर उभे.

पंजाबातले शेतकरी गेले दोन आठवडे दिल्लीच्या दारात आंदोलन करताहेत. कुठलंही आंदोलन हे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध असतं. आंदोलन व्यवस्थेत सुधारणांची, बदलाची मागणी करतं. परिणामी, प्रस्थापित व्यवस्था आंदोलनांमुळं असुरक्षित बनते, हे साधारण तत्त्व. या तत्त्वाबरहुकूम या आंदोलनाकडं पाहिलं गेलं आणि आजही जातंय. शेती व्यवस्थेच्या कायद्यांमध्ये केलेल्या नव्या बदलांबद्दल साशंक असणारा मोठा गट पंजाबमध्ये आहे. तो देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्येही आहे. या गटाचं प्रतिनिधित्व दिल्लीच्या दारात सुरू असलेल्या आंदोलनातून उमटलं.

सोशल मीडियामुळं हे आंदोलन देशातल्या कोट्यवधी मोबाईलवर पोहोचू लागलं. टिपिकल पंजाबी वळणाच्या, ज्येष्ठ शेतकऱ्याचा डोळे सुजलेला फोटो आंदोलनाचं प्रतीक बनू लागला. हे प्रतीक मोडून काढण्यासाठी मग आंदोलनाला भारतविरोधी शक्तींची फूस असल्याचा प्रतिहल्ला सुरू झाला. आजअखेरचा अनुभव असा आहे, की प्रश्न विचारणारे प्रतिसादाच्या उन्मादाला बळी पडतात आणि प्रतिहल्ला करताना प्रस्थापित व्यवस्था सत्य पूर्ण स्वरूपात मांडत नाहीत किंवा असत्याचा आधार घेतात. या आंदोलनाबाबतही अगदी तसंच होतंय. एका बाजूनं आंदोलनाला प्रतिसाद दाखविण्याच्या मोहापायी सोशल मीडियावर जुनेच फोटो ‘आजचे’ म्हणून व्हायरल होताहेत आणि प्रतिहल्ला करणारे जुनेच व्हिडिओ ‘आंदोलन खलिस्तानवाद्यांचं’ म्हणून पर्सेप्शन उभं करण्याच्या मागं लागलेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण सातत्यानं बोलतोय, की सोशल मीडिया अजून आपण स्वीकारण्याच्या अवस्थेत आहोत. म्हणजे, या तंत्रज्ञानाचं आपल्याला पूर्ण आकलन झालेलं नाहीय. त्याचे फायदे-तोटे रोज नव्यानं समोर येताहेत. आंदोलनाचा प्रसार होणं हा आंदोलकांच्या फायद्याचा भाग मानू. मग, खलिस्तानवादी म्हणून याच आंदोलनाकडं बोट दाखविण्याचा प्रकार हा आंदोलकांना सोशल मीडियावर तोटा करून देणारा प्रकार असतो. शंभरामधल्या दहा लोकांच्या मनात शंकेची घंटा वाजली, तरी आंदोलनाच्या शक्तीला तडे जायला लागतात.

अशा परिस्थितीत, वापरकर्ता (युजर) म्हणून आपली जबाबदारी वाढत राहते. जे दिसतं, तेच सत्य मानावं, असं आपण शिकलोय. सोशल मीडियानं ही शिकवणी मोडीत काढलीय. ‘जे दिसतंय, ते सारंच काही सत्य नाही. सत्य ही पारखून घ्यायचीच गोष्ट आहे,’ हे नवं शिक्षण सोशल मीडियानं दिलंय.

(सम्राट फडणीस, samrat.phadnis@esakal.com)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com