कौशल्याधारीत रोजगानिर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे.

'यिन' केंद्रीय समिती रिसर्च वेबिनार सिरीज.
कौशल्याधारीत रोजगानिर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे.

रोजगार निर्मितीतील आव्हानांवर मात करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. नोकरशाहीतील लालफिती कमी करणे, स्त्री-पुरुष समानतेला चालना देणे आणि कौशल्याधारीत उद्योजकतेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, तेव्हाच देशात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते असे मत संस्थापक व सी.टी.ओ.रेवम्प मोटोचे पुष्कराज साळुंखे यांनी व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूहाच्या ' यिन' केंद्रीय समितीच्या ऑनलाईन रिसर्च वेबिनार सिरीजममध्ये ' रोजगार : संधी आणि आव्हाने' या विषयावर ते बोलत होते.

साळुंखे म्हणाले, की आपला देश अजूनही रोजगार निर्मितीसाठी संघर्ष करत आहे. प्रामुख्याने रोजगार हा देशाच्या विकासासाठीचा मुख्य अडथळा आहे. देशातील शिक्षणप्रणाली व्यावसायिक कौशल्यांऐवजी सैद्धांतिक ज्ञानावरच भर देत आहे.

लालफितीत अडकलेली नोकरशाही वेळखाऊ प्रक्रियांसाठी ओळखली जाते. परवाने आणि इतर नियामक मंजूरी मिळण्यासाठी काही महिने, वर्ष लावली जातात त्यामुळे नवीन उद्योगांच्या निर्मितीस अडथळा येतो.पदवीधर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये करिअर पर्याय आणि नोकरीच्या संधींबद्दल माहितीचा अभाव असतो.

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आपल्या कार्यात सक्रिय असणे,मजबूत संभाषण कौशल्ये विकसित करणे आणि रोजगारभिमुख कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत व परिचय निलेश चव्हाणके यांनी केले. सुत्रसंचालन रोजगार समितीची संघटक अंकिता नगरकर यांनी केले. समितीचे संघटक योगेश पांचाळ यांनी आभार मानले.

काम मागणारा बनण्यापेक्षा; काम देणारा बना.

'यिन 'ऑनलाईन वेबीनारमध्ये हर्षद बेळे यांचा तरुणाईशी संवाद

देशातील वाढत्या बेरोजगारीच्या नावाने सरकारला कोसत बसू नका. सध्या भारतासह अनेक देश बेरोजगारीच्या प्रश्नाला सामोरे जात आहेत. कुणाची चाकरी करण्याऐवजी स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करा आणि इतरांच्या हाताला काम द्या, काम मागणारा बनू नका तर काम देणारा बना असे मत माजी सनदी अधिकारी हर्षद बेळे यांनी व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूहाच्या ' यिन' केंद्रीय समितीच्या ऑनलाईन रिसर्च वेबिनार सिरीजममध्ये ' रोजगार : संधी आणि आव्हाने' या विषयावर ते बोलत होते.

हर्षद बेळे प्रशासकीय सेवेत आय ए एस अधिकारी होते, त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या वडिलांचा उद्योग हातात घेतला.एस एस इंटरप्राईजेस उद्योग समूहाचे ते संचालक आहेत.

वेबीनारमध्ये बोलताना बेळे म्हणाले की, उद्योजक बनण्याची अशा बाळगणाऱ्या तरुणांनी सत्तेवर असलेल्या सरकारला कोसत न बसता त्यांनी आणलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. उद्योजकतेसाठी स्टार्ट अप इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा अनेक योजना आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे. शहरी- ग्रामीण भागासाठी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी हवे असलेले निकष आपण पूर्ण केले पाहिजे.

बेरोजगारीच्या नावाने न ओरडता आपणच रोजगारनिर्मिती का करू नये असा विचार तरुणाने केला पाहिजे.

आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे, हे आपण निश्चित केले पाहिजे. आजवर देशाने खूप चांगली माणसे दिली आहेत, त्यांना आपण वाचले पाहिजे. तरुणांनी रोजचा वर्तमानपत्र वाचला तरी ते चांगले उद्योजक बनू शकतात. मार्गदर्शक शोधायची गरज नसते,ज्या गोष्टीतून शिकायला मिळते ती प्रत्येक गोष्ट आपली मार्गदर्शक असते.

आपण आपल्या देशात रोजगार निर्माण करू नाही शकलो तर आपण जगात कुठेच रोजगार निर्माण करू शकत नाही. रोजगारासाठी आवश्यक बाबी आपल्याकडे आहेत. फक्त त्या ओळखता आल्या पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल. असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोजगार समितीची संघटक आदिती सुर्यवंशी यांनी केले. स्वागत व परिचय संघटक अमृता जगदाळे यांनी करून दिला. वेबीनारचे तांत्रिक काम अमृता गायकवाड यांनी पाहिले. सुत्रसंचालन समितीचे अध्यक्ष नीलेश चव्हाणके यांनी केले. संघटक रविराज मासाळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com