नवरा शेतकरीच हवा... तो कष्टाळू, निर्व्यसनी हवा

मलिकवाड, जि. बेळगाव - फक्त शेतकरी नवरा निवडीसाठी झालेल्या शेतकरी वधू-वर मेळाव्यात अपेक्षा व्यक्त करताना एक तरुणी.
मलिकवाड, जि. बेळगाव - फक्त शेतकरी नवरा निवडीसाठी झालेल्या शेतकरी वधू-वर मेळाव्यात अपेक्षा व्यक्त करताना एक तरुणी.

मलिकवाड, जि. बेळगाव (कर्नाटक) - माझं नाव...आहे. मी बी. कॉम झाले आहे. मला शेतकरी नवराच हवा. किमान ५ एकर तरी शेती हवी, तो प्रगतिशील आणि कष्टाळू हवा... त्याचे उत्पन्न चांगले हवे, तो निर्व्यसनी हवा... अशा अपेक्षांनी येथे ‘वर’ म्हणून फक्त शेतकरी मुलगा निवडीसाठी झालेला पहिला ऐतिहासिक शेतकरी वधू-वर मेळावा झाला.

महाराष्ट्र व कर्नाटकातील सुमारे ३८० मुलींनी शेतकरी ‘वर’ कसा असावा याबाबत अपेक्षा व्यक्त करत शेतकरी नवऱ्यासाठी पसंती दाखवली. येथील दिगंबर जैन मंदिराच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी दोन्ही राज्यांतील सुमारे ९५० इच्छुक शेतकरी वरांनी नोंदणी केली. एक एकरापासून शंभर एकर क्षेत्र असलेल्या मुलांनी यात सहभाग घेतला. लग्नाच्या बाजारात शेतकरी वराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. 

श्री १००८ मुनीसुवृत्तनाथ जैन मंदिर, विराचार्य पतसंस्था बेडकिहाळ, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जैन समाजाने पुढाकार घेऊन हा मेळावा घेतला. एवढ्यावरच न थांबता जे अपंग, अनाथ, गरीब मुले मुली असतील, तर मंदिर कमिटी लग्नाचा सर्व खर्च करणार असल्याची घोषणा या वेळी मालिकवाड मंदिर कमिटीने या वेळी केली.

आज फक्त शेतकऱ्यांसाठी हा मेळावा घेऊन संयोजकांनी आमच्यासारख्या विवाह इच्छुक मुलांमध्ये एक नवा उत्साह आणला आहे.
- मयूर देसाई, नरंदे, जि. कोल्हापूर

शेतकरी सुखी तर जग सुखी हे वाक्य मी माझ्या आयुष्यातही अमलात आणले आहे. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला लग्न ठरताना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. हे केवळ बोलून न दाखवता मी शेतकरी मुलाशी लग्न करून एक चांगला संदेश देणार आहे.
- प्राजक्ता बिरादर, कुपवाड, जि. सांगली

आजच्या युगात लग्न करून बाहेर नोकरीला जायचे आणि आई वडिलांना तसेच त्यांच्या हलाखीच्या स्थितीत टाकून जायचे, अशी उदाहरणे आहेत. शेतकऱ्यांशी लग्न झालयास आई वडिलांची सेवाही करण्याचे संस्कार यातून घडू शकतात, हाही या मेळाव्यामागचा उद्देश आहे. आम्ही दोन्ही राज्यांतील ७२ गावांमध्ये महिला मंडळाची वधू-वर जागृती बैठक घेतली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
- रावसाहेब कुनुरे, संयोजक

दीडशे वधू-वरांची प्राथमिक बोलणी
रविवारी सकाळी सुरू झालेला हा मेळावा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता. वधू-वर परिचयातून सुमारे दीडशे वधू-वरांनी प्राथमिक बोलणी जागीच करून लग्न ठरण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले. मेळाव्यासाठी संजय कुनुरे, श्रेणिक भेंडीकटगे, अशोक भेंडीकटगे, विजय चिंचवाडे, बाळासाहेब पाटील, महेंद्र पाटील, राजू पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com