फसवणुकीनंतरही घेतली उभारी कोरफड प्रक्रियेत रोडे यांची भरारी

Aloe-Vera
Aloe-Vera

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका मुळा नदीमुळे बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. याच नदीवरच खंदर माळगाव हे साधारणपणे एक ते दीड हजार लोकसंख्येचे गाव असून, बहुतांश शेतकरी हे डाळिंब, गहू, हरभरा, भाजीपाला अशी पिके घेतात. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी नवीन पिके घेत असतात. नांदूर खंदरमाळ येथील पारंपरिक पद्धतीने शेती करणारे तानाजी रोडे (वय ५०) दहा वर्षांपूर्वी जाहिरातीद्वारे झालेल्या फसवणुकीनंतरही कोरफड पिकांच्या विक्रीसाठी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करत यशस्वी मार्ग काढला आहे. 

खोट्या जाहिरातीचा बळी - 
साधारणतः २००४ मध्ये पुण्यातील एका खासगी कंपनीने दिलेल्या ‘कोरफड लावा, लाखो रुपये कमवा’ जाहिरातीला तानाजी रोडे बळी पडले. पुण्यात कंपनीच्या अधिकाऱ्याशी भेटून, कंपनीने खरेदीची हमी दिल्यामुळे स्वतःच्या सात एकर पैकी एक एकर क्षेत्रावर कोरफड लागवड केली. कोरफड काढणीला आल्यानंतर संबंधित कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याचे कळले. कोरफड लागवडीत फसल्याचे लक्षात आल्यानंतर परिचितांमध्ये ते चेष्टेचा विषय झाले. अशावेळी एखादी व्यक्ती खचून गेली असती, मात्र तानाजी यांनी आत्मचिंतन करत स्वतःला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवले. 

कोरफडीवर केला अभ्यास - 
कोरफडीच्या आयुर्वेदिक गुणधर्म जाणून घेतल्यानंतर त्याचे अनेक फायदे तानाजी यांच्या लक्षात आले. कोरफडीच्या नुसत्या विक्रीपेक्षा त्यापासून उत्पादनांची निर्मिती केल्यास अधिक फायदा होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यातून काय काय बनविता येईल, याविषयी माहिती मिळवली. कोरफडीपासून ज्यूस, कोल्ड्रिंक्स, क्रीम अशी विविध उत्पादने असली तरी त्याचे प्रशिक्षण किंवा प्रकल्प जवळपास कोठेही उपलब्ध नव्हते. त्यांनी प्रयोग करण्यास सुरवात केली. 

गोठ्यालाच बनवले प्रयोगशाळा - 
- कोरफडीची चव कडू असल्याने औषधी असूनही सहजासहजी माणूस खात नाही. मग त्याचा ज्यूस अन्य शीतपेयांप्रमाणे गोड स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तानाजी रोडे कामाला लागले. घराजवळच्या गोठ्यातील गाई बाहेर काढत त्यांचे प्रयोग सुरू झाले. सुरवातीला कोरफड कापून त्यातून पांढरा गर बाजूला काढून विविध मिश्रणे बनवत ज्यूस बनविण्याचा प्रयत्न केला. अनेक चुकांतून शिकत योग्य असा कोरफड ज्यूस बनविला. मात्र, तो चोवीस तासांपेक्षा अधिक टिकेना. तो टिकविण्यासाठी पुन्हा प्रयोग करत एक फॉर्म्युला शोधला. 


- कोणत्याही फळाच्या ज्यूसपेक्षा कोल्ड्रिंक्सला अधिक मागणी असते, हे हेरून त्यांनी कोरफडीपासून कोल्डिंक्स बनविण्याचा प्रयोग सुरू केले. यात शेतीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी परिस्थिती खालावली. पैशाची चणचण भासली, की दावणीची गाय बाजारात जाऊ लागली. मात्र, तानाजी यांचे संशोधन सुरूच राहिले. सुमारे पाच वर्षांनंतर कोल्ड्रिंक्स बनविण्यात यश आले. ज्यूस, कोल्ड्रिंक्स, क्रीम अशी विविध उत्पादने बनवली. तयार उत्पादने काही आजारी व्यक्तींना दिली. त्यांच्या चांगल्या प्रतिक्रियेमुळे उत्साह वाढला. मात्र, शासनमान्य प्रयोगशाळेतून प्रमाणिकरण केल्याशिवाय व्यावसायिक उत्पादन घेता येत नसल्याचे त्यांना समजले. प्रयोगशाळेचा शोध सुरू झाला. 

तपासणीचा रिपोर्ट आला अनुकूल - 
- एका मित्राने सुचवलेल्या पाषाण (पुणे) येथील प्रयोगशाळेमध्ये जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. हातउसने पैसे घेत पुणे गाठले. मात्र, तिथे फक्त औषधांची तपासणी होत असल्याचे समजल्याने ते पूर्ण निराश झाले. घरी जाण्यासाठी शिवाजीनगरला जाताना लागलेल्या कृषी विभागाच्या कृषी भवन येथे चौकशीसाठी आत गेले. 
- संगमनेर येथील कृषी विभागाच्या एका कार्यक्रमात भेटलेल्या युवराज साळुंखे यांची आठवण झाली. त्यांचे पद वगैरे काही माहीत नव्हते. विभागामध्ये विचारत विचारत त्यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्या पिशवीतील कोरफडीचे उत्पादन दाखवत प्रयोगशाळेविषयी विचारणा केली. त्यांचे शब्द संपण्याच्या आत ‘तुमचं काम झालं, लॅब आपल्याकडेच आहे’ असे संचालक साळुंखे यांनी सांगितले. त्यांच्या उत्तराने तानाजी यांचा चेहरा खुलला. 
- या प्रयोगशाळेत उत्पादन तपासले गेले. त्याचा रिपोर्ट अनुकूल आला. जागतिक दर्जाची गुणवत्ता व केमिकल शून्य, प्रॉडक्ट मानवी वापरास योग्य असल्याचे निदर्शनास आले. 

परवान्यासाठी धडपड - 
- उद्योग उभारणीसाठी यंत्रे व परवाना आवश्यक होता. परवान्यासाठी मुंबईला गेल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागा, प्रकल्प, बांधकाम याविषयी माहिती दिली. त्यानुसार गायीच्या गोठ्यात सुधारणा करत तीन लाख खर्चात शेड उभी केली. मात्र, अधिकाऱ्यांच्या तपासणीत या शेडची उंची कमी असल्याने परवाना नाकारला गेला. 
- आतापर्यंत पावलोपावली नकार पचवत आल्याने नकाराने न खचता ते पुन्हा मुंबईला गेले. या प्रकल्पामागचा संपूर्ण संघर्ष संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितला, तेव्हा फाटक्या कपड्याआड लपलेला संशोधक शेतकरी अधिकाऱ्यांना कळला. पुन्हा पाहणी करत अधिकाऱ्यांनी अखेर त्यांना परवाना दिला. तानाजी यांच्या संघर्षाचे एक वर्तुळ पूर्ण झाले असले तरी भांडवल उभारणीची खरी लढाई अद्याप बाकी होती. 

कर्जासाठी शोधाशोध सुरू - 
- संशोधन व अन्य धावपळीतून खिसा पुरता मोकळा झाला होता. यंत्रे घेण्यासाठी कर्ज व अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पहिले प्रकरण खादी ग्रामोद्योगकडे केले, ते नामंजूर झाले. मग तानाजींना गावातील पण पुण्यात स्थायिक झालेल्या कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योगच्या शोभना सुपेकर यांची आठवण झाली. त्यांना भेटले. सुपेकर यांनी तानाजींना खादी ग्रामोद्योगच्या एक लाखाच्या अनुदान मिळवण्यासाठी मदत केली. हे अनुदान मिळणार होते प्रकल्प सुरू झाल्यावर! 
- गावातील बँकेकडे कर्जाचे प्रकरण दिले. मात्र, तांत्रिक त्रुटी काढत ते नाकारले गेले. कागदपत्रे पूर्ण केली तरी मंजूर होण्याचे नाव घेईना. मग मात्र तानाजी यांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध ग्रामसभेत आवाज उठवला. हे समजताच सूत्रे हलली. त्यानंतरही एक वर्षाने ६ लाख २२ हजार रुपये कर्जाची रक्कम त्यांच्या हातात पडली. 
- कर्ज मिळाले असले तरी यंत्राच्या खरेदीसाठी लागत होते १५ लाख रुपये. या वेळी मात्र त्यांचा उपहास, चेष्टा करणारे मित्र, नातलग त्यांच्या मागे उभे राहिले. यंत्रे आणली आणि उत्पादनाला सुरवात झाली. 

मार्केटिंगसाठी केली प्रयत्नांची पराकाष्ठा - 
उत्पादन सुरू केल्यानंतर प्रश्न होता तो मार्केटिंगचा. त्यासाठी कोल्ड्रिंक्स वितरणासाठी आवश्यक क्रेट व बॉटलच्या खरेदीसाठी टप्प्याटप्प्याने आतापर्यंत सुमारे ३० लाखांची गुंतवणूक झाली आहे. 
- प्रॉडक्ट चांगले, पण जाहिरात करायला पैसे नव्हते. मग तानाजींनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये उत्पादन नमुन्यादाखल मोफत देणे सुरू केले. यातून जाहिरात झाली. मात्र, यात ८-९ लाख रुपयांचा खर्च वाढला. त्यांच्या ग्रीन व्हॅली हर्बल्स कंपनीला पहिल्या वर्षात तोटा झाला. उत्पादनामध्ये गुणवत्ता असल्याने हळूहळू चांगली मागणी येऊ लागली. 
- दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अठरा लाख रुपयांचा नफा झाला. मात्र, आतापर्यंत उद्योगासाठी घेतलेले कर्ज एक कोटीपर्यंत पोचले होते. ते ही त्यांनी हळूहळू फेडले. 
- या वर्षी कंपनीला वीस लाख रुपयांचा खर्च जाता त्यांना अठरा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. 

विस्तारणीकरणाचे रखडले काम - 
- सध्या कोरफडीवर प्रक्रिया ते मार्केटिंगच्या कामासाठी मुले गणेश व सचिन हे कार्यरत असून, सुमारे १५ ते २० जण या टिममध्ये कार्यरत आहेत. पत्नी मीराबाई व दोन्ही सुना या शेतीमध्ये लक्ष देतात. 
- माणसांच्या साह्याने काम सुरू असल्याने सध्या उत्पादनांना मागणी चांगली असली तरी पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत. केवळ नगर, पुणे व नाशिक या जवळच्या प्रमुख शहरांमध्ये विक्री केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांच्या उत्पादनांची घारगाव, आळेफाटा, नारायणगाव, खेड, मंचर, चाकण, तळेगाव, अकोला, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, शिर्डी, राहुरी, पारनेर, नगर, पुणे या ठिकाणी विक्री होते. 
- उद्योग उभा करून साधारणपणे दहा वर्षे झाली. कर्जही फिटले आहे. कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तानाजी यांचे प्रयत्न सुरू आहेत. विस्तारीकरणासाठी आवश्यक कर्जाइतके तारण नसल्याने ते रखडले आहे. 

सध्या सात एकरांवर कोरफड - 
- दहा वर्षांपूर्वी एक एकर असलेले कोरफडीचे क्षेत्र आता संपूर्ण सात एकर झाले आहे. 
- दर दोन ते तीन वर्षांनी शेतात नवीन लागवड केली जाते. गेल्या काही वर्षांत सुमारे चार ते पाच फूट अंतरावर बारबाडीन सर मिलर या वाणाची लागवड सुरू केली आहे. यात ते विविध गहू, हरभरा अशी आंतरपिके घेतात. 
- कोरफडीवर तांबेरा सोडून इतर कोणताही रोग येत नाही. तांबेरा नियंत्रण व खतासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत असल्याने एकरी दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. 

कोरफडीचे फायदे - 
- पित्तशामक, उष्णता रोधक, पेस्टीसाईड व केमिकलचा साईड इफेक्ट दूर करते. 
- पोट साफ ठेवण्यास मदत होते. 
- रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 
- पचनक्रिया सुधारून भूक वाढते. 
- यकृताची कार्यशक्ती वाढते. 
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
- चेहऱ्याला लावल्यास त्वचा मुलायम होऊन त्वचा उजळ होते. 
- स्त्रियांसाठी अतिशय बहुपयोगी 

शासनाकडून अपेक्षा - 
- शासनाने शेतीपूरक उद्योगासाठी भांडवल पुरवठा होण्यासाठी कर्जाचे धोरण बदलणे गरजेचे. 
- उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास थेट अनुदान उपलब्ध करावे. 
- कोरफडीसह औषधी वनस्पतींच्या प्रक्रियेसाठी योग्य प्रशिक्षण मिळावे. 

या प्रकारात आहेत उत्पादने उपलब्ध 
- दोन वर्षांच्या कोरपडीपासून तयार केलेल्या उत्पादनांमध्ये औषधी गुणधर्म अधिक असतात, त्यामुळे त्याची किंमत ही अधिक असते. (उदा. एक लिटर ज्यूस ५०० रुपये) 
- साधारणपणे वर्षभर व्यवसाय असला तरी हंगामानुसार काही फरक होतो. हिवाळ्याची कोल्ड्रिंक्सची मागणी निम्म्याने कमी होते. या वेळी ज्यूस व क्रीम उत्पादन व विक्रीकडे अधिक लक्ष देतो. 

कोरफड ज्यूस -- ५०० मिलि --- २१५ रुपये - औषध म्हणून 
कोल्ड्रिंक्स --- २०० मिलि --- १५ रुपये - जिरा, ऑंरेज आणि लेमन या तीन फ्लेवरमध्ये उपलब्ध --- कोल्ड्रिंक 
क्रीम (जेली) --- ६० ग्रॅम ---- ९७ रुपये- भाजणे, मालिश केल्यास उष्णता कमी होते. --- सौदर्यवृद्धीसाठी 
तानाजी रोडे, ९८९०३८७०१९ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com