नोटारद्दमुळे द्राक्ष हंगाम धोक्‍यात

grapes
grapes

वाढत्या थंडीमुळे द्राक्षात गोडी उतरेना; नोटाबंदीने द्राक्षाचे दर खालावण्याची शक्‍यता 

सांगली - जिल्ह्यातील या वर्षीचा द्राक्ष हंगाम डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. दिवसेंदिवस थंडी वाढू लागली आहे. यामुळे द्राक्षाची गोडी येत नाही. मिरज पूर्व भागात अत्यल्प प्रमाणात द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. मात्र, नोटाबंदीमुळे द्राक्ष हंगाम धोक्‍यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. व्यवहार कधी सुरळीत होणार त्याकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नोटाबंदीमुळे द्राक्षाचे दर खालावण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. 

यंदा निसर्गाने साथ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागा रोगमुक्त आहेत. पाणीटंचाई वर मात करून द्राक्षबागा चांगल्या फुलवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षीपेक्षा अधिक दर मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यातच गेल्या महिन्यात सरकारने पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या पायखालची जमीन सरकली. याचा फटका त्या वेळी कमी प्रमाणात बसला. परंतु त्याचा परिणाम आत्ता मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. 

जिल्ह्यात व्यापारी येण्यास सुरवात झाली आहे. मिरज पूर्व भागासह अनेक भागांत अर्ली छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचा हंगाम सुरू झाला आहे. हळूहळू द्राक्ष खरेदीस वाढणार आहे. गेल्या वर्षी या महिन्यात 300 रुपये प्रतिपेटीला दर होता. मात्र, यंदा तो 200 रुपयांवर येणार असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगत आहेत. या वर्षीच्या या कृत्रिम संकटाला कसे सामोरे जायचे, याची चिंता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सतावू लागली असून, द्राक्ष हंगाम अडचणीत सापडला आहे. दर वर्षी अवघ्या चार महिन्यांमध्ये जिल्ह्यात हजारो कोटींची उलाढाल द्राक्ष खरेदी-विक्रीच्या माध्यमातून होत असते. या वर्षीचा हंगाम सुरू झाला आहे; मात्र रोकडटंचाईमुळे पूर्ण द्राक्ष उद्योग धोक्‍यात आला आहे. द्राक्ष पिकालाही या रोकडटंचाईचा फटका बसण्याची शक्‍यता अधोरेखित झाली आहे. 

थंडीमुळे द्राक्षाची गोडी कमी 
गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात थंडी वाढू लागली आहे. या थंडीचा फटका द्राक्ष पिकावर बसू लागला आहे. द्राक्षात गोडी उतरल्याशिवाय बाजारात त्याची विक्री करता येत नाही. अशी स्थिती निर्माण झाली आहे. नोटाबंदी आणि वाढत्या थंडीच्या परिणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

उधारीचे पैसे कसे द्यायचे? 
बॅंकेतून जरी पैसे मिळत असले तरी, मजुरांचे पैसे देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. तसेच उधारीवर खते, औषधे आणली आहेत. त्याचे पैसे कसे द्याचे असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर अडचणी वाढणार आहेत. अशी चर्चा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यात सुरू आहे. 

यंदा 220 रुपये दर 
द्राक्षाला सध्या सोनाकाचा दर 180 ते 220 तर काळ्या द्राक्षांचा शरद, सरिता यांचा दर 280 ते 300 रुपये चार किलो असा दर मिळत आहे. गतवर्षी हेच दर यापेक्षा 30 टक्‍के अधिक होते. बाजारपेठेत ग्राहक नसल्याचे कारण सध्या सांगितले जात आहे. 

दलालांकडून नाकाबंदी 
बाजारात पैसे नसल्याने ग्राहक नसल्याचे कारण सांगत हंगामाच्या सुरवातीपासूनच दलालांनी दर पाडण्यास सुरवात केली आहे. द्राक्ष दलालांकडे रोख रकमा नाहीत! त्यांच्या बॅंकेत पैसे आहेत की नाहीत हे माहिती नाही! त्यामुळे दलालांकडून चेक घेताना मोठी रिस्क शेतकऱ्यांना पत्करावी लागत आहे. त्यापेक्षा 10 टक्‍के कमी रक्‍कम द्या; पण रोख खरेदी करा, असा आग्रह शेतकरी धरताना दिसत आहेत. 

नोटाबंदीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पुढील सप्ताहात द्राक्ष हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी काळजीने व्यवहार करावेत. या संदर्भात लवकरच बैठक घेणार आहे. 
- सुभाष आर्वे, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com