Raigad market
Raigad marketsakal media

रायगड : आठवडा बाजारांमुळे अर्थचक्राला वेग; ५० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल

अलिबाग : कोरोनामुळे (corona pandemic) जगाच्या कानाकोपऱ्यात व्यवसायाच्या संकल्पनाच बदललेल्या दिसतात. यामध्ये इंटरनेटचा (internet) मोठा वाटा आहे; पण ग्रामीण भागातील ग्राहकांना हे आधुनिक पर्याय सोयीचे नसल्याने येथील व्यावसायिक, शेतकऱ्यांनी पुन्हा पारंपरिक आठवडा बाजाराची (weekly market) कास धरली. त्याचाच परिणाम ग्रामीण भागातील आठवडा बाजारांवर दिसत असून ते गर्दीने फुलू लागले आहेत. कोरोनामुळे हताश झालेल्या असंख्य व्यावसायिकांबरोबर जिल्ह्याच्या अर्थकारणाला (economic growth) यामुळे पुन्हा बळकटी मिळू लागली आहे.

Raigad market
'KDMC' चा भोंगळ कारभार; सीमेंट काँक्रीटीकरण झाल्यानंतर प्रशासनाला जाग

दर महिन्याला या सव्वाशेपेक्षा अधिक आठवडा बाजारात ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. विशेष म्हणजे कोरोना आठवडा बाजारात भाजीपाल्यासह सुकी मासळी, मसाल्याचे पदार्थ, मोबाईलचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने, भांडी, कपडे अशा सर्वच प्रकारच्या वस्तू कमी किमतीत मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडा बाजार हे ‘शॉपिंग मॉल’ ठरू लागले आहेत.
सहा दिवस शेतात काम करायचे आणि आठवड्यातील शेवटच्या दिवशी तयार झालेला माल जवळच्याच आठवडा बाजारात विकण्याचा रायगड जिल्ह्यातील मध्यम भूधारक शेतकऱ्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. यातून शेतकरी आणि ग्राहकांमधील दरी कमी होत असल्याने ग्राहकांनाही कमी किमतीत ताजा माल मिळू लागला आहे.

कोरोनामुळे कमीत कमी खर्चात व्यवसाय कसा करायचा, याबद्दल अनेकांनी धडा घेतल्याने दुकानाचे भाडे, वीजबिल, साठवणूक खर्च अशा प्रकारचे खर्च आठवडा बाजारामुळे टाळता येतात. सध्या कोरोना निर्बंध उठवण्यात आल्याने जिल्ह्यातील आठवडा बाजार कोरोना पूर्वीपेक्षा अधिक व्यापक स्वरूपात सुरू होत आहेत.

ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन

आठवडा बाजारातील वसुलीसाठी काही ग्रामपंचायतींमध्ये वर्षासाठी कंत्राटदार नेमले जातात. दुकानाचा आकार पाहिल्यानंतर १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत कर आकारला जातो. महिन्याला पाच ते दहा हजार रुपये भाडे भरण्यापेक्षा हा कर खूपच कमी आहे. वरसोली येथील विठ्ठल मंदिर परिसरात एकादशी बाजार सुरू करण्यात आले आहेत. देवदर्शनासह गृहिणींना बाजार खरेदी करता येते. अशातून देवदर्शानातून बाजारहाट ही नवी संकल्पना जिल्ह्यात रुजू लागली आहे. यातून देवस्थानाचेही उत्पन्न वाढू लागले आहे.

Raigad market
‘नवाब मलिक हटाव... मुंबई बचाव...’; राजीनाम्यासाठी भाजपचा बुधवारी मोर्चा

सुविधा उभारण्यावर भर

ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळत असल्याने बाजारात येणाऱ्या दुकानदारांना स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सायंकाळच्या दरम्यान वीजपुरवठा अशा सुविधा पुरवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायती आपला निधी वापरू लागले आहेत. थळ, पोयनाड येथील मोठ्या बाजारांमध्ये कायमस्वरूपी शेड उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय बाजारात येणाऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी मोकळी दिली जाते. दर आठवड्याला ठराविक दिवशी यात्रेचे स्वरूप येत असल्याने ग्रामपंचायतींकडूनही आठवडा बाजाराचे बारकाईने नियोजन केले जाते.

फिरती दुकाने वाढू लागली

ज्या विक्रेत्यांकडे स्वतःची वाहने आहेत, असे विक्रेते एक आठवडा बाजार संपल्यावर राहिलेला माल जवळच्या दुसऱ्या आठवडा बाजारात नेऊन विकतात. यामध्ये सुकी मासळी, कांदे-बटाटे, कपडे विक्रेते संपूर्ण आठवडाभर मालाची विक्री करतात. अशा प्रकारचे व्यावसायिक एका ठिकाणी स्थिर दुकाने न थाटता सतत फिरत असल्याने जिल्हाभरातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत त्यांना पोचता येते.

कोरोनापूर्वी अलिबाग बाजारपेठेत दुकान होते. मात्र, भाडे न भरता आल्याने ते बंद करावे लागले. घरात शिल्लक राहिलेला कटलरी सामान फुकट जाऊ नये म्हणून थळ येथील आठवडा बाजारात जाऊन विकण्याचा प्रयत्न केला. यास चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर थळ, पोयनाड, हटाळे, हाशिवरे या ठिकाणी कटलरी साहित्य विकतो. फक्त तिथे साहित्य घेऊन जाण्याची अडचण असते.
- सुगंधा पवार, विक्रेत्या

आमच्या पाच गुंठा जागेत आम्ही उन्हाळी वाल, टॉमेटो, गावठी मिरच्या, कोबी पिकवतो. सहा दिवस शेतात काम केल्यावर तयार झालेला माल सोमवारी पोयनाड आठवडा बाजारात एकाच दिवशी विकता येतो. स्वतः पिकवलेल्या मालाची विक्री करण्याचा समाधान यातून जास्त मिळतो.

- वासंती पाटील, भाजीविक्रेत्या

सुकी मासळी विकण्यासाठी आठवडा बाजार उत्तम ठिकाण आहे. आठवडा बाजारात २५ रुपये भाडेपट्टी भरल्यानंतर दिवसाला २० ते ३० हजारापर्यंत उलाढाल होते. मे महिन्यात ही आणखी वाढते. आम्ही एक टेंम्पो घेतला. या टेम्पोत माल भरून एका बाजारातून दुसऱ्या बाजारात सहज नेता येते. शिवाय या टेम्पोत जेवण, दुपारच्या वेळेला थोडासा आरामदेखील करता येतो.
- जयमाला पेरेकर, मासळीविक्रेती

माझी सासू चणेरा आठवडा बाजारात काजूगर, करवंदे, रायवळी आंबे घेऊन यायच्या. हा माल विकल्यानंतर आलेल्या पैशातून घरातल्या आवश्यक वस्तू विकत घेऊन जात होती. किराणा सामान विकत घेण्यासाठी आठवडा बाजार हे हमखास ठिकाण आहे.
- सुलोचना मांडवकर, गृहिणी

ज्या ग्रामपंचायतीमध्ये नव्याने आठवडा बाजार सुरू करायचा असेल, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळाल्यानंतर तेथील सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. यासाठी आवश्यक करवसुलीचे निकष ग्रामपंचायत कायद्यानुसार ठरलेले आहेत.
- नीलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत (प्रभारी)

दृष्टिक्षेप
जिल्ह्यातील आठवडा बाजार : १२८
बाजारांमध्ये दोन वर्षांत झालेली वाढ (टक्के) : २०
प्रत्येक आठवडा बाजाराची सरासरी उलाढाल (लाखांत) : १० ते १५

काही प्रमुख आठवडा बाजार
ठिकाण वार
थळ- रविवार
पोयनाड- सोमवार
हटाळे- गुरुवार
खोपोली- गुरुवार
हाशिवरे- शुक्रवार
सहाण- रविवार
रोहा- शुक्रवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com