
हरी किसन पोतेकर गेल्या सात वर्षांपासून देशी केळीची शेती करीत आहेत.विशेष म्हणजे शून्य मशागत व सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करून आपल्या दर्जेदार केळ्यांना त्यांनी वर्षभर मागणी व बाजारपेठ तयार केली आहे.
सातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील हरी किसन पोतेकर गेल्या सात वर्षांपासून देशी केळीची शेती करीत आहेत. विशेष म्हणजे शून्य मशागत व सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करून आपल्या दर्जेदार केळ्यांना त्यांनी वर्षभर मागणी व बाजारपेठ तयार केली आहे.
सातारा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवर शेंद्रे गावात पाण्याची उपलब्धता आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानाही असल्याने सर्वाधिक उसाचे पीक गावात होते. येथील हरी किसन पोतेकर हे कृषी पदवी संपादन केलेले प्रगतिशील शेतकरी आहेत. शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात कोरडवाहू त्यानंतर दोन विहिरी घेत आपले साडेआठ एकर क्षेत्र त्यांनी बागायत केले. आले, सोयाबीन ही पिके ‘रोटेशन’ पद्धतीने घेतली जायची. दरम्यानच्या काळात उसाचे क्षेत्र वाढले. अपेक्षित दर मिळत नसल्याने पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. केळीची आवश्यक माहिती घेऊन दोन एकरांत ग्रॅंड नैन वाणाची लागवड केली. पहिल्या प्रयोगात चांगले उत्पन्न मिळाले. मात्र अपेक्षित दर मिळाला नाही. तरीही न खचता पीक सुरू ठेवले.
केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार शेती
देशी केळीची शेती
शेजारील भाटमरळी येथील शेतकरी देशी केळीची लागवड करून बहुतांशी विक्री थेट करायचे. वर्षभराची मागणी व मिळणारे उत्पन्न पाहून हा प्रयोग करण्याचे ठरवले. भाटमरळी येथील राहुल चव्हाण यांच्या मदतीने लागवड केली. सुमारे १२ महिन्यांनी उत्पन्न सुरू झाले. पुणे- बंगळूर महार्मागावर (सातारा- कोल्हापूर) शेत व घर असल्याने रस्त्याच्या कडेला छोट्या काउंटरद्वारे थेट विक्री सुरू केली. या पहिल्या प्रयोगात उत्पन्नही चांगले मिळाले. केळीस मागणी चांगली असल्याने क्षेत्र वाढण्याचा निर्णय घेतला. नवीन लागवडीसाठी तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील नर्सरीतून रोपे आणून तीन एकर क्षेत्रात आठ बाय सात फूट अंतरावर लागवड केली.
पोतेकर यांच्या पत्नी निर्मला केळी विक्री व्यवस्था, नर्सरीची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे शेतातील अन्य कामांमध्ये मला जास्त वेळ देता येत असल्याचेही पोतेकर अभिमानाने सांगतात. केळी विक्रीत आईचीही त्यांना खूप मदत झाली आहे. बोरगाव कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ भूषण यादगीरवार, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, कृषी सहायक यांचेही मार्गदर्शन मिळते. पुढील काळात रायपनिंग चेंबर व कोल्ड स्टोअरेज उभे करण्याचा मनोदय आहे.
शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर
सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन ः ठळक बाबी
पोतेकर यांनी अलीकडील चार वर्षांत रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर जवळपास थांबवला आहे. बहुतांश भर सेंद्रिय पद्धतीवर दिला आहे.
बागेतील पालापाचोळा. पीक अवशेष एक आड सरीत ठेवण्यात येतो. हा पाला कुजण्यासाठी जिवामृत, डी कंपोजर यांचा वापर होतो.
सुमारे ५६ हजार रुपये खर्चून द्रवरूप जिवामृत देणारी यंत्रणा अर्थात एक हजार लिटर क्षमतेचा प्लांट उभारला आहे.
नैसर्गिकरीत्या केळी पिकविण्यासाठी हवाबंद खोली तयार केली आहे.
जूनमध्ये प्रति एकरी दोन ट्रेलर शेणखत, तसेच कोंबडीखत प्रत्येकी एक ट्रेलर यांचा वापर
प्रत्येक महिन्याला ठिबकद्वारे २०० लिटर जिवामृत. घडांवरही दोन ते तीन वेळा जिवामृताची फवारणी.
अलीकडील काळात शून्य मशागत तंत्रावर भर.
उत्पन्नाची ‘सायकल’ कायम राहण्यासाठी प्रत्येक वर्षी अर्धा एकर ‘रोटेशन’ पद्धतीने लागवड
या पद्धतीमुळे वर्षभर हातात खेळता पैसा राहतो.
स्वतःकडे जनावरे नसल्याने अन्य शेतकऱ्यांकडून शेणखणाची खरेदी करून जिवामृत तयार केले जाते.
काळे डाग जाण्यासाठी केळी स्वच्छ पाण्यात धुतली जाते.
बांधावर आंबा, चिकू आदींची लागवड. त्यांचीही थेट विक्री करण्यावर भर
केळी बरोबर, ऊस, आले या नगदी पिकांचेही दमदार उत्पादन
शेतीला पूरक म्हणून फुले, झाडे, शोभेच्या रोपांची नर्सरी व व्यवसाय
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे सेंद्रिय गूळनिर्मिती
देशी केळीची वैशिष्ट्ये
सुमारे १४ महिन्यांत परिपक्व
चवीला आंबट-गोड
वर्षभर मागणी
रोग-किडीला कमी बळी पडते.
हरी पोतेकर ९९७५८०८४८५, ९१३०२३९८५३