उत्कृष्ट मधमाशीपालनातून उत्पादन, गुणवत्तेतही वाढ

मधमाशीपालन व सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करीत डाळिंब शेतीत पोपट ढुके यांनी ठसा उमटवला आहे.
मधमाशीपालन व सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करीत डाळिंब शेतीत पोपट ढुके यांनी ठसा उमटवला आहे.

अगोती (जि. पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी पोपट ढुके यांनी डाळिंब बागेत उत्कृष्टपणे मधमाशीपालन करीत काटेकोर व्यवस्थापनाचा नमुना पेश केला आहे. त्यास सेंद्रिय पद्धतीची जोड देत एकरी उत्पादन व त्याचा दर्जाही उंचावला आहे. त्यांच्या या कतृत्वासाठी दोन वेळा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर हा डाळिंब व उसासाठी प्रसिद्ध तालुका. अगोती हे या तालुक्यातील गाव.गावातील पोपट तात्याबा ढुके यांची आता प्रगतिशील डाळिंब उत्पादक म्हणून अोळख झाली आहे.

शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय पत्नी, दोन मुले (महेश व मंगेश) असा त्यांचा परिवार आहे. मुलीचे लग्न झाले आहे. ढुके यांचे एकूण क्षेत्र १६ एकर आहे. सन १९७७ मध्ये त्यांची १७ एकर शेती धरणाखाली गेली. मात्र ते डगमगले नाहीत. उपलब्ध क्षेत्रातच प्रयोगाच्या वाटा ढुंढाळत राहाव्यात व प्रगती करीत राहावे याच ध्येयाने ते पुढे चालले. 

ऊस थांबवून डाळिंबातच लक्ष 

अगोती गाव हे उसासाठी प्रसिद्ध होते. अलीकडील काळात मात्र या भागातील शेतकरी डाळिंब, पेरू अशा पिकांकडे वळले आहेत. ढुके यांचेदेखील एकेकाळी बहुतांश क्षेत्र उसाखालीच होते. मात्र, बदलत्या काळाचा कानोसा घेत तेही डाळिंबाकडे वळले. 

आजची ढुके यांची शेती दृष्टिक्षेपात 
सुमारे १२ एकर डाळिंब
तीन एक जंबो आकाराचा पेरू 
एक एकर पेरू

डाळिंबाची प्रयोगशील शेती 
डाळिंब शेती ढुके सुमारे चार ते पाच वर्षांपासून करीत आहेत. सन २०१२ मध्ये तीन एकर क्षेत्र त्यांनी या पिकाखाली आणले. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करीत गेले. सुरवातीचे अनुभव घेत व चांगले व्यवस्थापन यामुळे एकरी भरघोस उत्पादन मिळू लागले. आज जुने व नवे असे मिळून १२ एकर क्षेत्र.

भगवा वाण. जमीन-काळी 
उजनी धरणाच्या बाजूलाच वास्तव्य व जमीन
पाणी व्यवस्थापनासाठी दोन विहिरी, बोअर तसेच उजनी धरणातील बॅकवॉटरचा फायदा घेतला. तेथून पाण्याची पाइपलाइन केली. त्यामुळे संरक्षित पाण्याची सोय केली आहे. 
खत व्यवस्थापनामध्ये शेणखत, निंबोळी पेंड, कोंबडी खत आदींचा वापर 

मधमाशीपालनाचे समजले महत्त्व 
सन २०१४ मध्ये बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. सन २०१५ मध्ये थंडी जास्त होती. त्यामुळे कळीचे सेटिंग झाले नाही. जवळपास सर्वच कळी गळाली. त्यामुळे काहीच उत्पादन हाती मिळाले नाही. त्या वेळी मित्राचा सल्ला उपयोगी पडला. त्यांनी परागीभवनासाठी मधमाशीपालन करण्याचा सल्ला दिला. बारामती कृषी विज्ञान केंद्राचा (केव्हीके) संपर्क त्यातून झाला. त्यानंतर ढुके केव्हीकेशी जोडले गेले ते कायमचेच. 

उत्पादन वाढले 
डाळिंब बागेचे एकूणच ठेवलेले चोख व्यवस्थापन, मधमाशीपालनातून झालेले परागीभवन, त्यातून कळीचे झालेले सेटिंग यांचा फायदा उत्पादनावाढीत दिसून आला. 
सन २०१६- साडेचार एकरांत- ४८ टन उत्पादन मिळाले. त्यापूर्वीच्या वर्षी तेवढ्याच एकरांत २६ टन उत्पादन मिळाले होते. 

दर्जेदार डाळिंबास  चांगले दर 
उत्पादनवाढीबरोबर त्याचा दर्जाही चांगला मिळाला. अर्थात दरवर्षी आवकेचा व दरांचा फटकाही सहन करावा लागला. तरीही दोन वर्षांपूर्वी किलोला ५२ रुपये दर मिळाला. सन २०१६ मध्ये मात्र बाजारात मंदी होती. माल कमी होता. त्या वेळी किलोला ८७ रुपये कमाल दर मिळाला. अर्थात दर्जा हा घटकदेखील त्याला कारणीभूत होता. ढुके म्हणतात की मधमाशीपालन व जैविक घटकांचा वापर या गोष्टीला कारणीभूत असेल. त्यामुळे मालही एकाचवेळी तोडणीला आला होता.

या बाबींवर दिले लक्ष 
केव्हीकेच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून सुरवातीला एक पेटी बागेत ठेवली. 

मधमाश्यांना हानीकारक ठरेल अशा कीडनाशकांचा वापर थांबवला. त्याएेवजी सेंद्रिय वा जैविक कीडनाशके फुलोरा अवस्थेत वापरण्यास सुरवात केली. त्याचा फायदा होऊ लागला.  

एका पेटीपासून पुढे पेट्यांची संख्या वाढू लागली. तशा त्यातील मधमाश्यांची संख्या वा वसाहतीदेखील वाढू लागल्या. अशी संख्या ३० ते ४० पेट्यांपर्यंत पोचली. 

सन २०१६ मध्ये योग्य निगा ठेवल्यानेच मधमाश्यांची संख्या वाढून एका पेटीवर आणखी दोन पेट्या ठेवाव्या लागल्या.

मधमाशीला साखर पाक देणे, पाणी देणे, पेट्यांची काळजी घेणे या बाबींचीही काळजी घेतली. 

आसपासच्या शेतकऱ्यांनीही खूप साह्य केले. त्यांनीही जैविक शेतीचा आधार घेतला. त्यामुळे आर्थिक बचत झाली.

बागेत तेलकट डाग रोगानेही सुमारे १० टन मालाचे नुकसान झाले. बागेत मर रोगही होता. मात्र केव्हीकेकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार कडुनिंबावर आधारित कीडनाशक, स्युडोमोनास तसेच मर व मूळकूज यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा वापरणे यांसारख्या बाबींचा अवलंब करून बाग कीड-रोगमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला. एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनातील विविध घटकांचा उदा. सापळे यांचाही वापर झाला. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे कीड नियंत्रण सोपे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com