‘डोणूआई’ शेतकरी गट : एकीतून प्रगतीकडे

done village
done village

पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उत्तरेकडे सुमारे दीडशे कुटुंबाचे डोणे गाव वसले आहे. या भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने भातासाठी हा प्रसिद्ध पट्टा आहे. आपल्या भागातील समस्या दूर करून शेती अधिक फायदेशीर व समृद्ध करण्यासाठी गावातील सुमारे वीस होतकरू समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यांनी गटाची स्थापना केली.  

गटाची उिद्दष्टे 
सन २०१३ मध्ये ग्रामदैवत डोणूआईच्या नावाने कृषी गटाची स्थापना. सचिन वाडेकर गटाचे अध्यक्ष आहेत. 
दरमहा एक हजार रुपये प्रतिसदस्य बचत. बचतीची रक्कम गटातील गरजू व्यक्तींना नाममात्र व्याज आकारून दिली जाते. आत्तापर्यंत गटाकडे एकूण पंधरा लाख रुपयांची बचत. 
सेंिद्रय भातशेती व सेंिद्रय दुग्धव्यवसाय ही येत्या काळातील उिद्दष्टे. 

सक्षमीकरणावर भर 
विविध उपक्रमात महिलांचा सहभाग वाढवा, यासाठी गटामार्फत महिलांच्या गटास ठरािवक अनुदान (गेल्या सहा महिन्यांपासून चार हजार दोनशे रुपये प्रतिमहिना)
शेतकामे सांभाळून महिलांना दळणासाठी विशेषतः पावसाळ्यात पायपीट करावी लागते. हे श्रम हलके करण्यासाठी गटातील वीस सदस्यांसह अन्य दोन जणांना घरगुती पीठ गिरणीचे वाटप. 
पंधरा सदस्यांना शौचालये बांधण्यासाठी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त होण्यासाठी मदत   
'आत्मा’च्या अधिकाऱ्यांचे गटाला साह्य लाभले आहे.  

राबवलेले उपक्रम 

बांधावर निविष्ठा वाटप योजना   
 शेतकऱ्यांना भातासाठी खत खरेदी करण्यापासून ते शेतात खत टाकण्यापर्यंत विविध अडचणी यायच्या. प्रामुख्याने वेळेवर खते उपलब्ध न होणे, वाहतुकीच्या साधनांचा, तसेच वेळेचा अभाव यामुळे त्रास सहन करावा लागे. गटाने बांधावर खतवाटप योजनेचा लाभ घेतला. सामूहिक पद्धतीने खताची मागणी नोंदविली. संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना थेट घरपोच खत उपलब्ध झाले. सुमारे दोन टन खताचे वितरण झाले. त्यातून पैशांची व वेळेची बचत झाली. 

 भाताचे एकरी पाच किलो याप्रमाणे सुमारे दोनशे किलो बियाण्याचे वाटप गटाला झाले. त्याचबरोबर विळा, कीडनाशके यांचाही लाभ घेतला.  

चारसूत्री पद्धतीने उत्पादन वाढले  
गटातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनेंतर्गत चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. गटातील सदस्य काळूराम घारे पूर्वी पारंपरिक पद्धतीत गुंठ्याला ४५ किलोपर्यंत उत्पादन घेत. चारसूत्री, सुधािरत बियाणे व एकूण व्यवस्थापनातून त्यांनी हेच उत्पादन तब्बल ९८ किलोपर्यंत घेतले. भातपीक प्रात्यक्षिक स्पर्धेत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळवले. 

बायोगॅस प्रकल्प  
जळणासाठी लाकडाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्याचबरोबर धूर निर्माण होऊन आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. या समस्येवर उपाय म्हणून गटातील चार शेतकऱ्यांनी बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे. उर्वरित शेतकरीही त्याकडे वळणार आहेत. 

भात कापणी  यंत्राची खरेदी  
दर वर्षी भात कापणीच्या वेळेस मनुष्यबळाची मोठी अडचण तयार होते. त्यावर मात करण्यासाठी सुमारे एक लाख रुपये किमतीच्या भात कापणी यंत्राची नुकतीच जानेवारीत खरेदी केली. त्यास ७० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यंत्रामुळे श्रम, वेळ, पैशांची मोठी बचत होणार आहे.   

वनराई बंधारे   
दोन-तीन वर्षांपूर्वी पावसाळा संपल्यानंतर गावातील ओढ्यावर पाणी अडवून भूजल पातळी वाढविण्यासाठी चार वनराई बंधारे बांधले. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.   

 विहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत 
 डोणे भागात पावसाळ्यात मुबलक पाणी असले, तरी मार्च ते मेपर्यंत पाण्याची तीव्र टंचाई भासते. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांनी फक्त आश्वासने दिली. परंतु प्रश्न तसाच राहिला. 

गटातील सदस्यांनीच मग कोणावर विसंबून न राहता पुढाकार घेतला. गटातील चार शेतकऱ्यांना बिनव्याजी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. काही वििहरीस पाणी उपलब्ध झाले आहे. सामाईक विहिरींवरील ताणही त्यामुळे कमी झाला आहे.   

कोणतेही हेवेदावे, गटतट, राजकारण यांच्यापासून अलिप्त राहून सामंजस्याने व एकमुखी निर्णयातून आम्ही काम करतो. त्यामुळेच गटशेतीला खरे बळ मिळाले आहे. 
- काळूराम घारे, गट सदस्य  : ९७६५५४४४११

 व्यवसायवृद्धीसाठी आर्थिक मदत  
शेतीबरोबर गटातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसायास उत्तेजन दिले जाते. आत्तापर्यंत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदींसाठी आर्थिक मदत झाली. त्याचा गटातील सहा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यास फायदा झाला.  

आपत्कालीन निधी पुरवठा   
काही वेळा आपत्कालीन संकटांना सामोरे जावे लागते. त्या प्रत्येक वेळी प्रत्येकाकडे पैसे असतातच असे नाही. अशा वेळी गटामार्फत संबंधित सदस्यास पंचवीस हजार रुपयांची बिनव्याजी तत्काळ मदत केली जाते. गटामार्फत प्रत्येक सदस्याची आयुर्विमा पाॅलिसी काढली आहे. त्याचा हप्ता दरमहा बचत केलेल्या रकमेतून भरला जातो. त्यामुळे सदस्यांमध्ये जिव्हाळा तयार होऊन कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी मनोबल वाढण्यास मदत होते. गेल्या मार्चमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शेतकरी गट म्हणून पुरस्कार देऊन ‘डोणूआई’ गटास सन्मानित करण्यात आले आहे. 

संतोष कारके, ९८८१७७७०८०  (गट सदस्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com