स्मशान भूमी नव्हे, पर्यटन स्थळ; पिराचीवाडी झाली उपक्रमशील गाव

pirachiwadi
pirachiwadi

कोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे उपक्रमशील गाव म्हणून पुढे आले आहे. केवळ तीनहजार लोकसंख्येच्या या गावाने आर्थिक नियोजन व निधीचे योग्य व्यवस्थापन केले. त्यातून  आरोग्य स्वच्छता, गाव सुशोभीकरण, महिलांचे सक्षमीकरण, मंदिरे, शाळांना सुविधा, मंदिर उभारणी  आदी विविध बाबींमधून विकासाची कामे यशस्वी मार्गी लावली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पिराचीवाडी (ता. कागल) हे भात, नाचणी अशी हंगामी पिके घेणारे गाव म्हणून ओळखले जाते. गावचे शेतीचे क्षेत्र तीनशे हेक्टरच्या आसपास आहे. गावातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. साहजिकच उदरनिर्वाहाचे पर्यायी साधन म्हणून साखर कारखान्यात साखरेची जड पोती उचलण्याचा मजुरी व्यवसाय त्यांनी सुरू केला. मग तोच पायंडा पडला.

गावचे रूपडे बदलले  
अलीकडील वर्षांत गावचे रुपडे बदलण्याचा निश्‍चय झाला. विकासाची कामे व अर्थकारणाला बळ मिळाले. गावचे सरपंच सुभाष भोसले यांनी पुढाकार घेतला. चार कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवीत गावासाठी पाण्याची सोय केली. गावातील निम्याहून अधिक क्षेत्रावर उसाचे पीक दिसू लागले. स्वमालमत्ता गहाण टाकून पाण्याची सोय करणारे भोसले लोकनियुक्त सरपंचपदापर्यंत पोचले. त्यानंतर  ग्रामपंचायतीने  शासनाकडे पाठपुरावा करत गावच्या विकासालाही हातभार लावला. शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त कामे करण्याचे कसब पाहायचे असेल तर पिराचीवाडीचे उदाहरण दिशादर्शक ठरेल.

स्मशान भूमी नव्हे, पर्यटन स्थळ
अनेक गावांमध्ये काही इमारती, मंदिरे गावची शान असतात. पिराचीवाडीत तर स्मशानभूमीच पर्यटकांचे आकर्षण बनली. सुमारे दोन गुंठे क्षेत्रातील स्मशानभूमी क्षेत्राचे सुशोभीकरण केले आहे. जलसुविधा, आमदार निधी व चौदाव्या वित्त आयोगातून सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च करून स्मशानभूमीचे क्षेत्र सजविले आहे. यामध्ये दहा- बारा प्रकारची शोभेची आणि फुलांची झाडे लावली आहेत. लोकवर्गणीतून बाकडी बसविली आहेत. झाडांना ठिबकद्वारे पाणीपुरवठा होतो. प्रथमदर्शनी एखादी बाग पाहिल्याचा भास स्मशानभूमीकडे पाहून होतो. लोकांचे वाढदिवस, आनंदसोहळे येथे आयोजित केले जातात. सेल्फी पॉईंटही येथे तयार केला आहे. स्मशानभूमीप्रति भिती घालवण्यासाठी ग्रामपंचायतीने हा कल्पक उपक्रम पूर्ण केला आहे. 

सुशोभीकरणावर मेहनत
गावचे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने मेहनत घेतली आहे. यामध्ये मुख्य ठिकाणी पेव्हींग ब्लॉक्स, विविध वस्त्यांना जोडणारे साकव यासाठी सुमारे सत्तर लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. गावात प्रवेश करताना कुठेही अस्वच्छता दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी बंदिस्त गटारी, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचरा वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन, क्रीडांगण, अत्याधुनिक व्यायामशाळा, खुले कुस्ती मैदान व सराव तालीम या बाबी गावचे वैभव वाढविणाऱ्या ठरल्या र्आहेत. शंभर टक्के शौचालयाचा वापर, अंगणवाड्यांचे पालटलेले रूप आगी गोष्टीही विकासात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. गावातील कामांचे नियोजन करुन विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रस्ताव दिला की तातडीने त्यास मंजुरी मिळायची. त्यामुळे विकासकामासाठी निधी कमी पडला नाही असे सरपंच सुभाष भोसले यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंदिरांची उभारणी 
शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामपंचायतीने गावातील महादेव, हनुमान मंदिर, गहिनीनाथ देवालय यांच्यासाठी शासकीय निधी मिळविला आहे. हनुमान मंदिराचे बांधकाम सुरू आहे. दोन कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.

महिलांसाठी प्रशिक्षणे
महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणांचे सातत्याने आयोजन होते. गरोदर मातांनाही मार्गदर्शन करण्यात येते. त्यांच्या आरोग्यासाठी विविध प्रकारचं शिबिरे आयोजित केली जातात.

बारमाही भाजीपाला  शेतीतून आर्थिक बळकटी

शाळांना सुविधा
प्राथमिक शाळेमध्ये इ लर्निंग सेवेसाठी लोकवर्गणीतून संगणक देण्यात आले आहेत. याच बरोबर अंगणवाडीच्या सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे. कल्पकता वापरून भिंती रंगविण्यात येत असून यासाठी विविध भित्तिचित्रे तयार करण्यात आली आहेत.

गावविकासाची वैशिष्ट्य़े 

  • भाजीपाल्याची थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गावातील मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायतीकडून सिमेंट कॉंक्रीटचा ओटा. 
  • दोन- तीन वर्षांत सत्तर लाख रुपये खर्चून गावातील रस्त्यांचे डांबरीकरण
  • प्रमुख मार्गांवर दुतर्फा विविध शोभेची सावली देणारी झाडे. त्यांच्याभोवती कापडी आच्छादन असलेले  संरक्षक कठडे. त्याची ग्रामपंचायतीमार्फत देखभाल. गावातील बाह्य रस्त्यांसाठी सुमारे पाच कोटी रुपये मंजूर. 
  • सुमारे तीस लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायत कार्यालयाची आकर्षक वास्तू बांधली आहे. 
  • गावात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत.
  • दुमजली इमारतीत प्रत्येक पायरीवर सुविचार
  • कचरा टाकण्यासाठी विशेष सुविधा 

‘हायटेक’ प्रणालीचा  वापर

  • ऑनलाइन सात बारा व वीजबिल भरण्याची सुविधा
  • ग्रामसभांची माहिती एसएमएस व इमेलद्वारे
  • ग्रामपंचायतीचे स्वतंत्र संकेतस्थळ
  • घरोघरी ‘एलइडी’चा वापर करण्यास प्रोत्साहन

    (Edited By- Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com