भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. भाजपने १९९९ लाही विजय मिळवला. त्यानंतर २००९, २०१४, २०१९ अशी विजयाची हॅट्ट्रीक केली. आता भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी विखे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. दोघांमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. विकासाच्या मुद्द्यावर दोघेही एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या लढतीत मतदारराजा कुणाला कौल देणार? याची जिल्ह्यासह राज्यात उत्सुकता आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मागील तिन्ही निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी २००९मध्ये ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा, तर २०१४ मध्ये राजीव राजळे यांचा पराभव केला. २०१९ मध्ये भाजपने गांधी यांच्याऐवजी डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देत विजयाची हॅट्ट्रीक केली. विखे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा दोन लाख ८१ हजार मतांनी पराभव केला. आता ते पुन्हा नव्या दमाने निवडणूक रिंगणात आहेत.
पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा ते मतदारांसमोर मांडत आहेत. लंके मात्र विखे यांना सडेतोड उत्तरे देत आहेत. त्यांनी मतदारांची दिशाभूल केली असल्याचे लंके ठासून सांगत आहेत. त्याचबरोबर २४ तास उपलब्ध राहून जनतेसाठी मी मोबाईल खासदार म्हणून काम करणार असल्याचा विश्वास देखील मतदारांना देत आहेत. नगरकर मतदार कुणाच्या पारड्यात आपले दान टाकतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
विखे आणि लंके या दोन्ही उमेदवारांची मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात सभा आणि रोड- शो होणार आहेत. त्याचबरोबर लहान- मोठ्या सामाजिक संघटना आणि जातीय समूहांच्या बैठका घेण्यात येत आहेत. वेगवेगळ्या जात समूहांचे पॉकेट मतदान मिळविण्यासाठी उमेदवारांच्या गोपनीय बैठकाही सुरू आहेत. त्यासाठी उमेदवारांची यंत्रणा कामाला लागली आहे.
मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. कामाच्या शोधासाठी तरुणांना मुंबई, पुणे गाठावे लागते. जिल्ह्यात सुपे, नगर आणि पांढरीचा पूल अशा तीन एमआयडीसी आहेत; परंतु या ठिकाणी मोठे उद्योग आले नाहीत. लहान- मोठे उद्योग सुरू झाले, मात्र ते देखील बंद पडले. सुपा एमआयडीसीत काही जपानी कंपन्या आल्या; परंतु तेथे अद्याप पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले नाहीत. परिणामी जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला नाही. या निवडणुकीत एमआयडीसी हा प्रचारातील प्रमुख मुद्दा आहे.
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी योगदान ठरणारी साकळाई पाणी योजना वर्षांनुवर्षांपासून निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनत आहे. दोन्ही तालुक्यातील ४० ते ५० गावांचा शेतीचा पाणीप्रश्न या योजनेमुळे सुटणार आहे. प्रत्येक निवडणुकीत ‘साकळाई’ पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात येते. या निवडणुकीत साकळाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विखे आणि लंके हे दोन्ही उमेदवार हा प्रश्न कसा हाताळतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.