Ahmednagar : लसीची मात्रा लम्पीवर चालेना

कर्जत हॉटस्पॉट, १५ लाख जनावरांचे लसीकरण
 lumpy disease News
lumpy disease Newssakal

अहमदनगर : जिल्ह्यात लम्पी स्किनचा आजार आटोक्यात आला आहे, असे वाटत असतानाच जनावरांचा मृत्यूदर वाढला आहे. तब्बल १५ लाखांचे लसीकरण झाले असताना दररोज जनावरांच्या मृत्यूचे आकडे वाढत आहेत. आजअखेर १ हजार ३६३ जनावरे दगावली आहेत. त्यामुळे लसीच्या प्रभावीपणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यात हे थैमान सुरू आहे.

दिवाळीनंतर लम्पीचा मृत्यूदर वाढला आहे. २१८ गावांत सध्या बाधित जनावरे आहेत. २१ हजार ६६३ जनावरांना लम्पीची लागण झाली. त्यातून १३ हजार ५२१ बरे झाले. सध्या पाच किलोमीटरच्या परिघात १२ लाख २९ हजार ४७५ पशुधन आहे. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग ही लस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. सध्या स्वच्छ गोठा अभियान राबविले जात आहे. सुरूवातीला लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे काळजी घेतली जात होती. आणि जनावरांचा मृत्यूदरही कमी होता. आता काळजी कमी झाली अन मृ्त्यूदर वाढला आहे.

प्रारंभी अकोले आणि संगमनेर, तसेच कर्जत-श्रीगोंदा तालुक्यात लम्पीचा कहर होता. मृत्यूदराबाबत हे तालुकेच आघाडीवर आहेत. सध्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे ३० विद्यार्थीही पशुसंवर्धन विभागाला साहाय्य करीत आहेत. म्हापसूच्या प्रोटोकॉलनुसार तज्ज्ञांच्या मदतीने उपचार केला जात आहेत. पॅथॉलॉजीचे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे.

राशीनच्या बाजारामुळे बेजार

जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी पहिले बाधित जनावर आढळले होते. ७ सप्टेंबर रोजी राशीनचा बाजार बंद केला होता. या बाजारातूनच सर्वाधिक संसर्ग झाल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. काळेवाडी, राशीन, रावकाळेवाडी,परीटवाडी, कानगुडवाडी, सोनाळवाडी, चिलवडी, देशमुखवाडी, बारडगाव दगडी, तोरकडवाडी आदी गावांना जास्त फटका बसला. या बागायती भागात जास्त पशुधन आहे. तेथेच लम्पी संसर्ग वाढला. एकतर जनावरे दगावली आणि दुसरीकडे दुधउत्पादनावरही परिणाम झाला.

तालुकानिहाय मृत्यूचे आकडे

(हे जनावरांचे मृत्यूचे आकडे दोन दिवसांपूर्वीचे आहेत. त्यात आज आणखी भर पडली आहे)

कर्जत - ३२० श्रीगोंदे - २१७ संगमनेर - १५७

अकोले - १२१ पारनेर - १०९ नेवासा -७१

राहुरी - ५६ श्रीरामपूर - ४० राहाता - ३८

पाथर्डी - ३५ नगर - ३० शेवगाव - २१

जामखेड - ८ कोपरगाव - १

नेमके काय?

लम्पी आजारातून जनावरांना संरक्षण मिळावे, यासाठी हेट्रोजेनिस लस दिली जात आहे. या लसीचा प्रभाव ६० ते ७० टक्क्यांपर्यंतच आहे. ही लस लम्पीसदृश आजारावर दिली जाते. काही जनावरे कृश असतात, त्यांना या लसीचा उपयोग होताना दिसत नाही. विंडो पिरीयडमध्ये लस दिली असेल तरीही जनावरे दगावल्याचे दिसून येत आहे.

लम्पी स्किन आजार समुहातील १० टक्केच जनावरांना होतो. जिल्ह्यात १५ लाख जनावारांना लस दिली आहे. त्यामुळे जवळपास १०० टक्के लसीकरण झाले आहे. स्वच्छ गोठासारखी मोहीम सुरू आहे. पावसामुळे तसेच सकस चारा न मिळाल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे काही जनावरे दगावतात. परंतु लम्पी आटोक्यात आला.

- डॉ. संजय कुमकर,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com