कसा करावा ऑनलाईन अभ्यास? नेटवर्कच मिळेना

How to study online? No network found
How to study online? No network found

नगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने अद्याप शाळा व महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन पद्धतीने अध्यापनास सुरवात झाली असली, तरी ग्रामीण भागात नेटवर्कच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वित्त आयोगाच्या खर्चातून सर्व ग्रामपंचायतींमध्ये वायफायची सुविधा द्यावी व त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी नेटवर्क उपलब्ध करून द्यावे, असे मत व्यक्त होत आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. शहरासह आता ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. कोरोनामुक्ती होईपर्यंत शाळा सुरू करू नका, असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने शिक्षणास सुरवात केली आहे. मोबाईल व इतर साधनांद्वारे विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. 

नेटवर्कअभावी अडचणी 

अनेक पालक कर्ज काढून मोबाईल खरेदी करीत असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापनात सहभागी करीत आहेत. मात्र, त्यातही नेटवर्कचा अडथळा येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शासनातर्फे निवडण्यात आला असला, तरी तेवढी सुविधा ग्रामीण भागात नाही. त्यामुळे पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

साडेसात लाख कुटुंबांची सोय 

राज्य सरकारने 15व्या वित्त आयोगातील पैशातून ग्रामपंचायतींमार्फत नेटवर्क पुरविण्याची मागणी जोर धरत आहे. या निधीतून ग्रामपंचायतींमध्ये नेटवर्कची यंत्रणा उभारली, तर जिल्ह्यातील 1602 गावांचा कारभार 1318 ग्रामपंचायतीमार्फत साडेसात लाख कुटुंबांना नेटवर्कची सुविधा देणे शक्‍य होईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येऊ शकते, असे मत व्यक्त होत आहे. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी होत आहे. 

इंटरनेट सुविधेचा विचार व्हावा 

केंद्र सरकारने भारत नेट योजना सुरू केली आहे. त्यात जिल्ह्यातील फक्त 500 ग्रामपंचायती तहसील कार्यालयाशी जोडलेल्या असून, इतर कार्यालये बाकी आहेत. ही योजना कार्यान्वित होण्यास अवधी लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमार्फत इंटरनेटची सुविधा पुरविण्याचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

प्रशासनाने विचार करावा 

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सर्व ग्रामपंचायतींना नेटवर्कची सुविधा करून दिल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्‍य होईल. यासाठी प्रशासनाने विचार करावा. 
- जालिंदर वाकचौरे, सदस्य, शिक्षण समिती, जिल्हा परिषद 

विजेचीही मोठी अडचण 

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्कसह विजेची मोठी अडचण आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे द्यायचे असतील, तर ग्रामपंचायतीमार्फत नेट सुविधा पुरविणे गरजेचे आहे. 
- राजेश परजणे, सदस्य शिक्षण समिती, जिल्हा परिषद 

शिक्षण समितीत ठरवू 

ग्रामपंचायतींमार्फत विद्यार्थ्यांना नेटवर्क पुरविण्यासंदर्भात शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 
- प्रताप शेळके, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com