
शिर्डी ः खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या नियोजनाअभावी ऐन खरीप हंगामात पेरणीलाच खोडा झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उपलब्ध नसलेली खते आणि बियाण्यांमध्ये झालेली फसवणूक, यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती लक्षात घेऊन, कृषी विभागाने खतांसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.
कृषिमंत्री दादा भुसे यांना विखे पाटील यांनी पत्र पाठवून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. कोणत्याही जिल्ह्यात मागणीप्रमाणे खतांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. युरियाची उपलब्धता कमी झाल्याने लिकिंग तक्रारीही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. अनावश्यक खते आणि रसायनांची सक्तीने खरेदी करायला लावून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड दिला जात असल्याकडे विखे पाटील यांनी कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
राज्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने सोयाबीन बियाण्यांची मागणीप्रमाणे उपलब्धता झाली नाही. अनेक कंपन्यांकडून निकृष्ट प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांच्या पदरात पडल्याने त्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या. सरकारकडून आणि कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अखेर न्यायालयात दाद मागावी लागत आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या हातून हा खरीप हंगाम वाया जात असल्याची बाब पत्रात नमूद केली आहे.
कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम हाच दिलासा देणारा आहे. त्यामुळेच, मोठ्या अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. मात्र, कृषी विभागाचा हलगर्जीपणा व नियोजनशून्यतेचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, खतांसाठी दुकानांपुढे लागत असलेल्या शेतकऱ्यांच्या रांगा, शेतकऱ्यांना पावत्या न देता खते आणि बियाणेविक्री, खतांचे लिकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विखे पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे. अहमदनगर
संपादन - सूर्यकांत वरकड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.