
शिर्डी ः परतीचा मॉन्सून रेंगाळला नाही, तर येत्या 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केले आहे. यंदा या नियोजनात "कोविड संसर्ग व्यवस्थापन' हे नवे काम कारखान्यांना पहिल्यांदाच करण्याची वेळ आली आहे. एकंदरीत उसाच्या फडातही कोरोना शिरला आहे. दरवर्षीच साखर कारखानदार व तोडणी कामगारांसमोर नवे संकट उभे राहते यंदा कोरोना महामारीने कंबरडे मोडले आहे.
एका कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडीच ते तीन हजार तोडणी कामगार बाहेरून येतील. त्यातील पाच टक्के बाधित होतील. हे गृहित धरून कारखान्यांनी त्यांच्यासाठी उपचार केंद्रे, ऑक्सिजन पुरवठा व व्हेंटिलेटर आदी सुविधा उपलब्ध करायच्या आहेत. शिवाय त्यांच्यासोबत येणाऱ्या मुलांना उसाच्या थळात न पाठविता, त्यांची वेगळी व्यवस्था करायची आहे. त्या दृष्टीने साखर पट्ट्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांनी कारखान्यांना सुचना देण्यास सुरवात केली आहे.
प्रत्येक तोडणी मजुराला कोविड चाचणी बंधनकारक असावी. 60 वर्षांवरील लोकांना तोडणीसाठी आणू नये. त्यांची कोविड चाचणी करावी. तोडणीसाठी कार्यक्षेत्रात आल्यानंतर त्यांना सात दिवस क्वारंटाईन ठेवावे. उसाच्या फडात जाऊन त्यांची दैनंदिन वैद्यकीय तपासणी करण्याची व्यवस्था करावी. त्यांच्यासाठी मास्क व सॅनिटायझरची पुरेशी व्यवस्था करावी. त्यांना नियमीत प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे दिली जावीत. कोविड चाचणीची सुविधा उपलब्ध करावी, अशा आशयाची पत्रे साखर कारखान्यांना धाडली जाणार आहेत. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच असे पत्र साखर आयुक्तांना धाडले आहे.
हेही वाचा - खरीपाच्या विम्यापोटी नेवासे तालुक्याला इतके कोटी
नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही अशा सुचना येतील, असे गृहित धरून पुर्वतयारी सुरू केली आहे. मात्र, बऱ्याच कारखान्यांकडे कोविड उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर नाहीत. त्यासाठी त्यांना सरकारी सेवेवर अवलंबून राहावे लागले, तर या यंत्रणेवरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ऊसतोडणी यंत्राची गरज
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणीच्या कामासाठी यंत्रांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना राज्य सरकारने कारखान्यांना केली आहे. यंदा यंत्रांची गरज लक्षात घेऊन राज्यातील कारखान्यांनी नव्याने 200 ऊसतोडणी यंत्रे खरेदीसाठी हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसोबत करार केले आहेत. एका यंत्राची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. पूर्वी त्याला 40 टक्के सरकारी अनुदान मिळायचे. अलिकडे ते बंद झाले. एक यंत्र दिवसाकाठी दीडशे मेट्रिक टन ऊसतोडणी करते. सक्षम कारखाना असेल, तर दोन ते अडिच वर्षात कर्ज फिटू शकते, असे समीकरण असले, तरी हा व्यवसाय आणि व्यवहार कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या मर्जीवर अवलंबून आहे.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.