शिर्डी (जि. नगर) : मुंबईत जोरदार कोसळत असलेल्या मॉन्सूनने सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या दिशेने कूच केले. त्याचा परिणाम म्हणून उत्तर नगर जिल्ह्यातील बारमाही शेतीचे भवितव्य अवलंबून असलेल्या मुळा, भंडारदरा व दारणा धरणसमूहात नव्या पाण्याची आवक सुरू झाली. दारणा धरण निम्मे भरले. उर्वरित धरणांतील पाणीसाठे तीस टक्क्यांवर गेले. उत्तर नगर जिल्ह्यात बारमाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही गुड न्यूज आहे. Water inflow continues in dams in Nagar district
तुटीमुळे त्रस्त असलेल्या गोदावरी कालव्यांचा पाणीपुरवठा दारणा धरणसमूहावर अवलंबून आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कालपासून मॉन्सूनचे आगमन झाले. दारणा धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंत वाढला. पावसाचा जोर वाढल्यास आठवडाभरात हे धरण भरू शकते. मात्र, या धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र सारखा पाऊस नाही. मुकणे धरणात २४ टक्के पाणीसाठा तयार झाला. वाकी, भाम, भावली व वालदेवी या छोट्या धरणांचा पाणीसाठा लक्षात घेतला, तर या धरणसमूहाचा साठा तेहतीस टक्क्यांवर गेला आहे.
पावसाने जोर न धरल्याने गंगापूर धरणसमूहाचा पाणीसाठा केवळ २६ टक्के आहे. भंडारदरा व निळवंडे धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या घाटघर, पांजरे व रतनवाडी परिसरात काल सरासरी दीडशे मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. या दोन्ही धरणांत मिळून तीस टक्के, तर मुळा धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची प्रतीक्षा कायम आहे. या सर्व धरणांत मागील वर्षीच्या तुलनेत तीस टक्के कमी पाऊस आहे.
सह्याद्री घाटमाथ्यावर पाऊस सुरू झाला. तथापि, त्याने जोर धरलेला नाही. पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने दारणा धरणाचा साठा पन्नास टक्क्यांवर गेला. त्यामुळे आठवडाभरात हे धरण भरून गोदावरी कालव्यांतून ओव्हर-फ्लो होऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली. मागील वर्षीच्या तुलनेत लाभक्षेत्र व पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण तीस टक्क्यांनी कमी झाले.
- उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.