Ahmednagar : पाणीदार नेतृत्व; मधुकरराव पिचड यांच्या आयुष्यातील अनमोल उपलब्धी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी मंत्री मधुकरराव पिचड

Ahmednagar : पाणीदार नेतृत्व; मधुकरराव पिचड यांच्या आयुष्यातील अनमोल उपलब्धी.....

Ahmednagar : अकोले तालुक्यातील जलक्रांतीचा इतिहास घडविण्यासंदर्भात जेव्हा महत्त्वपूर्ण नोंदींचा उल्लेख केला जातो, तेव्हा ‘पाणीदार नेतृत्व’ म्हणून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची दखल प्राधान्याने घ्यावी लागते. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार असलेल्या निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी आज झाली. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर निळवंडेचे जलक्रांतीचे मोल अधोरेखित होत आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या आयुष्यातील अनमोल उपलब्धी म्हणजे निळवंडेचे पूर्णत्व. केवळ धरणाचे साकारलेपणच नव्हे, तर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हणून राज्याला आदर्श ठरलेले हे नियोजन म्हणावे लागेल. सुरवातीची म्हाळादेवीची जागा सर्वकष विचारविनिमयातून बदलून नंतर निळवंडेच्या योग्य जागेचा शोध घेण्यात आला. तत्कालीन अभियंता डोके आणि पिचड यांच्या चर्चेतून निळवंडे - २ प्रकल्पाचा प्रारंभ घडला.

अनेक गावे अन् शेतकऱ्यांचे नुकसान टळले. मात्र, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे धोरण पिचड यांनी लावून धरले.प्रकल्पग्रस्तांना अकोले येथील बीजगुणन प्रक्षेत्रात जमिनी उपलब्ध करून देण्यात आल्यावर निळवंडे धरणाचा पाया घातला गेला. तत्कालीन परिस्थितीत राज्यात नोकरभरती होत नसतानाही पाटबंधारे खात्यात प्रकल्पबाधित मुलांना नोकऱ्या देण्यात आल्या.

याशिवाय उपसा जलसिंचन योजना, हेक्टरी स्वेच्छाअनुदान वाटप हे धोरण अवलंबले गेले. याशिवाय लक्षणीय बाब म्हणजे निळवंडे, निंब्रळमधील अल्प भूधारकांच्या जमिनी प्रकल्प, रस्ते, तसेच वीजनिर्मिती प्रकल्पासाठी गेल्यामुळे शेतकऱ्यांचाही समावेश प्रकल्पग्रस्त यादीत करण्यात येऊन प्रकल्पग्रस्तांचे लाभ प्राप्त करून दिले गेले.

धरणाचा सातत्याने पाठपुरावा हे वेगळेपण आणि अथक सातत्य हे पिचड यांचे वैशिष्ट्य या निमित्ताने प्रत्ययास आले. सामान्यांच्या प्रश्नांची जाणीव, आत्मीयता, कणखर बाणा, कुशल प्रशासन या गुणांमुळे निळवंडे लाभक्षेत्रातील सर्वांनीच पिचड यांच्याविषयी कृतज्ञता ठेवली आहे. निळवंडे जलाशयावरील मोठा पिंपरकणे उड्डाणपूल, धरणावरील विद्युतगृह निर्मिती, निळवंडे धरणाचे बंद पाइपमधील उच्चस्तरीय कालवेनिर्मिती ही दखलपात्र कामे पिचड यांनी मार्गी लावली.

जून १९९३ मध्ये सुरू झालेल्या निळवंडे धरणाच्या कामाचा प्रवास आणि उंचावत गेलेला आलेख, ते आजमितीला निळवंडे कालव्यातून प्रत्यक्ष पाणी सोडण्याची चाचणी इथपर्यंतचा जलक्रांतीचा हा खरा तर राज्याला ‘पिचड पॅटर्न’ ठरला. उच्चस्तरीय पाइप बंद कालव्यांचा निर्णय शासनाला घ्यावा लागणे, हा उल्लेखनीय अन् विलक्षण अनोखा प्रकल्प म्हणता येईल. उच्चस्तरीय डावा कालवा २०,६८० मीटर लांबीचा असून, उजवा पाइप कालवा लांबी १९,३७० मीटर आहे.

बहीरवाडी, ढोकरी, तांभोळ ही डाव्या कालव्यामुळे लाभ मिळणारी गावे सावंतवाडी, निंब्रळ पूल, कोकणेवाडीचा पूल आणि चितळवेढे पूल, प्रवरा नदीवरील प्रोफाइल वॉल, म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम, राजूर- पिंपरकणे उड्डाणपुलाचे काम, निळवंडे येथील जलविद्युत प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या, अशांचे जमीनवाटप प्रकरण, भंडारदरा- निळवंडे क्षेत्रातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बुडीत बंधारे, माळेगाव, केळुंगण, उपसासिंचन योजना व राजूर- टिटवी उपसासिंचन योजना, निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या लक्षणीय नोंदी या निमित्ताने घ्याव्या लागतील.

विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचे पिचड साहेबांचा निष्ठावंत पाईक, आंधळा भक्त म्हटले तरी चालेल, असा मी जवळून बघितलेल्या व अनुभवलेल्या घटनांचा साक्षीदार म्हणून मला सार्थ अभिमान आहे. पिचड साहेबांनी आमदार असताना १९८० मध्ये तालुक्यात जो ऐतिहासिक रुम्हणे मोर्चा निघाला, त्यात अलौकिक कामगिरी बजावली व संगमनेर अकोल्यास प्रवरेच्या पाण्यात ३० टक्के हिस्सा मिळावा ही आग्रही भूमिका मांडली.

त्याचे पडसाद राज्यभर पडसाद उमटले व परिणामी पिचड साहेबांनी पाण्यासाठी जो संघर्ष केला त्याचा परिणाम होऊन पाणी लढाईचे आमदार म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्या संधीचे साहेबांनी सोने केले. या सर्व घटनांचा त्यांच्या सुरवातीपासून तर आजपर्यंतच्या जीवनातील मी स्वतः साक्षीदार आहे. याच प्रवरेच्या पाण्यावर दूध संघ, साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पतसंस्था व एकूणच, तालुक्याचा झालेला कायापालट यात साहेबांचे कर्तृत्व निश्चितच मोलाचे व महत्त्वाचे ठरते.

पुढे पवार साहेबांच्या काळातील मंत्रिमंडळातून ते आदिवासींचा नेता म्हणून नेतृत्व करून ‘शेड्यूल ट्राईब’ साठी प्रथमच वेगळे बजेट तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. संपूर्ण नगर जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात मधुकर पिचड या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. निळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोल्याचा ही घोषणा अजूनही लोक विसरलेले नाहीत.

राघोजी भांगरेंच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी मिळवून ते स्मारक साकारण्यासाठी ठाणेकरांना बरोबर घेऊन अविरत प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची नोंद विविध संस्थांनी घेतली. कोणत्याही प्रकारचे अर्ज, विनंत्या न करता सन्मानाची पदे, पारितोषिके, जीवनसाधना गौरव प्राप्त झाले. वीर बिरसा मुंडा पुरस्कार आणि अगदी अलीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पिचड साहेबांनी यांना जीवनसाधना गौरवाने सन्मानित केले. झपाटल्यासारखे काम करणे ही त्यांची जीवनशैली प्रेरणादायी आहे.

सुधाकरराव देशमुख, सेक्रेटरी, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी