अकोला ः कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ११६८ विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ परिसरात आंदोलन केले. त्यानंतर आमदार रणधीर सावरकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूसोबत चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली न निघाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आमदार सावरकर यांनी दिला. (1168 students of Krishi Tantraniketan deprived of admission)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अकोला अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात ११६८ विद्यार्थ्यांनी कृषी तंत्रानिकेतांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या विद्यार्थ्यांना बी.एस.सी कृषी या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात दिल्या जाणाऱ्या प्रवेशाला विद्यापीठाने नकार दिला. त्यामुळे विदर्भातील ११६८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने विद्यार्थ्यांसोबत कृषी विद्यापीठात आंदोलन केले. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या आंदोलनामध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी वंचित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेऊन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे समवेत आंदोलक विद्यार्थी व भाजयुमोचे पदाधिकारी यांचेसोबत बैठक घेतली.
विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित ठेऊ नये, असे त्यांनी सांगितले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेले सुमारे सहा हजार ४२० विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आलेले आहे. कृषी तंत्रनिकेतांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बी.एस.सी कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश देण्यात येतो. परंतु हा अभ्यासक्रम शासनाने बंद केला असल्यामुळे आता अशा प्रवेशांना बंदी घातलेली आहे.
तथापी या वर्षात कृषी तंत्रानिकेतांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेली शेवटची तुकडी असल्याने या तुकडीच्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमास प्रवेश नाकारणे योग्य होणार नाही. याबाबतचा निर्णय राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी ता. १६ जून रोजी घेतला असल्याचे समजते. परंतु हा निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिषदेस अद्यापपर्यंत कळविण्यात आला नसल्याने आ. सावरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिषदेस तातडीने कळविण्यात येऊन १५ दिवसाचे आत विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचा निर्णय घ्यावा असे सूचित केले.
भाजयुमोचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांनी हा विषयाला वाचा फोडली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर भाजयुमो तीव्र आंदोलन करेल असा इशारा प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांनी दिला आहे. कृषी विद्यापीठात झालेल्या चर्चेच्या वेळी अंबादास उमाळे, जयंत मसने, सचिन देशमुख, जिल्हाध्यक्ष भाजयुमो, किरण अवताडे, अभिजित बांगर, नीलेश काकड, अमोल पिंपळे, सुयोग देशमुख, उज्ज्वल बामनेट, अक्षय जोशी, राजेश निनाळे, हमेंद्र सुनारीवाल, टोनी जयराज, अभिजित भगत, अविनाश जाधव, नितीन राऊत, अनुप गोसावी, ऋषिकेश अंजनकर, अमोल तळोकार, मंगेश झिने, शिवम बळापूरकर आदी उपस्थित होते.
1168 students of Krishi Tantraniketan deprived of admission
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.