
सोयाबीन, कापूस, तूर परवडण्याजोगी पिके राहिली नसल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी उद्योगशील शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.
पातुर (जि.अकोला) ः सोयाबीन, कापूस, तूर परवडण्याजोगी पिके राहिली नसल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी उद्योगशील शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. भारतातील पहिल्या सीएनजी निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते मंगळवारी पातुर तालुक्यातल्या दुर्गम भागातील नवेगावच्या माळराणावर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी नामफलकाचे अनावरण तथा भूमिपूजन करून प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. जैवइंधन निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी निर्माण करणारा ठरू शकतो त्याबरोबरच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करू शकतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सुद्धा या ऑरगॅनिक मिशनवर पाच कोटी रुपये खर्च करीत आहे. सध्या पारंपरिक खनिज तेलापेक्षा जैवइंधन एक स्वच्छ नैसर्गिक प्रयोग पर्याय आहे. जो देशाला प्रदूषण मुक्तीकडे नेईल. गेल्या काही वर्षांपूर्वी युरोप ब्राझील थायलंडमध्ये गवतापासून सीएनजी निर्मिती झाली आहे. त्याच पद्धतीने आपल्या देशात सर्वप्रथम पातुर तालुक्यामध्ये सीएनजी निर्मिती प्रकल्प उभा राहतो आहे, ही बाब शेतकऱ्यांसाठी जीवनमान बदलवणारी आणि बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करणारी महत्त्वपूर्ण अशी बाब ठरणार आहे. जैवइंधन पारंपारिक खनिज तेलांना एक सक्षम पर्याय उभा राहिल, असे डॉ. भाले म्हणाले. जगामध्ये तेलासाठी युद्ध झाले. त्यामुळे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी आपला भारत देश जैवइंधन निर्मिती बरोबरच शेतकऱ्याचा जीवनमान समृद्ध करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी ते बारा विद्यार्थ्यांचे समोर बोलून दाखविले होते. त्यापैकी एक मुंबईचे उपजिल्हाधिकारी श्री घोलप यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर प्रकल्प उभा राहतो आहे. पातुर तालुका माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत नफा देणारा एक सक्षम पर्याय उभा करणे त्याबरोबरच तालुक्यातील बेरोजगारांना तालुक्यातच रोजगार निर्मिती करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. येत्या दोन वर्षांमध्ये सदर प्रकल्प पातुर तालुक्यातील दुर्गम नवेगावच्या माळरानावर उभा राहतो आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, असे प्रास्ताविकातून शिलाबाई प्रोड्युसर संघटनेचे संचालक छगन राठोड यांनी सांगितले. या समारंभाला सीतान्हाणीचे ज्ञानेश्वर दास महाराज, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, तहसीलदार दीपक बाजड, गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे, गटशिक्षणाधिकारी यु. एल. घुले, चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, प्रकल्प अधिकारी समाधान राठोड, पातुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चरणसिंग चव्हाण, शेकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच हिरासिंग राठोड, नवेगावचे जनार्धन डाखोरे, माणिकराव जाधव आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आरजे श्री यांनी केले. (संपादन - विवेक मेतकर) |
|||