अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उशीराने सुरू झालेली आरटीई प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अद्याप केवळ एक हजार ७४७ विद्यार्थ्यांनीच निश्चित प्रवेश घेतला असून आरटीई कोट्यातील ५७६ जागा रिक्त आहेत. परिणामी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेली आरटीई प्रवेशाची मुदत मंगळवारी (ता. १५) संपणार आहे.
यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते;
परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत. दरम्यान प्रवेशाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे शासनाने गत आठवड्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप केवळ १ हजार ७४७ निश्चित प्रवेश झाले असून एक हजार २०८ तात्पुरते प्रवेश झाले आहेत.
जागा रिक्तच राहण्याची शक्यता
आरटीई अंतर्गत वेळोवेळी मुदत वाढवल्यानंतर सुद्धा पालक पाल्यांच्या प्रवेशासाठी निरूत्साही आहेत. कोरोनाच्या स्थितीमुळे शाळा केंव्हा सुरू होतील यासंबंधी सुद्धा अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. त्यामुळे यानंतर मुदतवाढ दिल्यांतर सुद्धा काही जागा रिक्तच राहण्याची शक्यता अधिक आहे. असे असले तरी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.