
तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; तहसीलदाराची गाडी पेटवली
बुलडाणा : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवार पासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व रविकांत तुपकर करत असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. कार्यकर्त्यांनी बुलडाणा तहसीलदाराची गाडी पेटवून दिल्याने आंदोलनास हिसंक वळण प्राप्त झाले आहे.
सोयाबीनला ८ हजार रुपये आणि कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव निश्चित केला जावा. बाजारात यापेक्षा कमी भावाने पीक विकले जाऊ नये, अशी मागणी करत पिकांवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा आहे, उद्योगपती आणि नेत्यांचा नाही, असे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले होते. तसेच, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
बुधवारी रात्री तुपकर यांना पोलिसांनी अटक केली होती. प्रकृती खालावल्याने त्यांना जबदस्तीने नागपूर येथील दवाखान्यात भरती करण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारास नकार देत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलं. त्यामुळे सरकारने तुपकर यांना जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं.
दरम्यान, आज तुपकर यांची प्रकृती खालावल्याची बातमी आल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले असुन, आंदोलनास हिंसक वळण लागले आहे. ठीक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने महामागार्वर वाहतूक कोंडी झाली.