अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारने जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हाती घेतली आहे. या योजनेतून राज्यातील जुन्या ९८ हजार प्रकल्पांची दुरुस्ती होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सोळा हजार प्रकल्पांची दुरुस्ती केली केली जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ११०० प्रकल्प असून, त्यासाठी तब्बल शंभर कोटींचा निधी अपेक्षित आहे, अशी माहिती जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
मंत्री गडाख जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, की मागील सरकारच्या काळात जलयुक्त शिवाराची कामे झाली होती. याबाबत आरोप-प्रत्यारोप झाले. जलसंधारण विभागाची धुरा हाती आल्यानंतर नव्या योजना सुरू करण्यास अडचणी आल्या. मात्र राजकीय वारसा असल्याने अडचणीवर मात करीत शेतकऱ्यांच्या हिताची व पिण्याच्या पाण्याची नड भागवणारी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हाती घेतली. कोरोना काळात इतर सर्वच कामांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र त्या काळात देखील स्वस्थ न बसता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेचा अभ्यास सुरू होता. या योजनेतून शून्य ते ६०० हेक्टर पर्यंत मर्यादेची कामे केली जाणार आहेत. तसेच बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व ऐतिहासिक
बंधारे यांची दुरुस्ती केली जाणार आहे.
राज्यात एकूण ९८ हजार प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कामे दोन टप्प्यांत होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १६ हजार कामे घेण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यातील सुमारे ११०० प्रकल्प असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही सर्व कामे सुरू झालेली आहेत. आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या कामांमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांसह सर्वांना होणार आहे. ही सर्व कामे श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी आदी तालुक्यांतील आहेत. पावसाचे पाणी शिवारातच अडवले जावे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, या दृष्टीने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना ही पथदर्शक ठरेल, अशी ग्वाही मंत्री गडाख यांनी दिली.
ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक विकासकामे होत आहेत. कोरोनामुळे अनेक अडचणी आलेल्या आहेत. त्यातून मार्ग काढत विकासकामे केली जात असून, आगामी काळातही कामे होणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य नक्कीच प्रगती करेल, असा विश्वास मंत्री गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.
विकासासाठी सुसंवादाची गरज
मागील पिढीत राजकारणात विचार व मतांची भिन्नता होती. मात्र त्यात कटुता नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पिढीचा काळ आता गेला आहे. तीव्र स्पर्धेमुळे राजकारण बदलले आहे. आता हातघाईवर व एकेरीवर टीका-टिप्पणी सुरू आहे. समाजाला हे राजकारण रुचत नाही. पूर्वी एकमेकांचा द्वेष व मत्सर नव्हता. आता त्यात वाढ झालेली आहे. विकासासाठी सुसंवाद ही काळाची गरज आहे. तरुणांनी काळजी घेऊन बदल करणे गरजेचे आहे, असे मत मंत्री गडाख यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.