नगर ः नगर दक्षिण मतदारसंघातून तीन वेळा लोकसभेवर प्रतिनिधीत्त्व केलेले आणि एकदा मंत्रिपद भूषवलेले दिलीप गांधी अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार की नगरमध्ये याविषयी लोकांमध्ये संभ्रम होता. मात्र, त्यांचे पार्थिव काल (गुरूवारी) दुपारी दिल्लीहून अॅम्ब्युलन्सद्वारे नगरमध्ये आणले.
त्यांच्या निवासस्थानापासून नालेगावातील अमरधामपर्यंत प्रमुख रस्त्यांवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. जिल्हाभरातून आलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रासह भाजप व अन्य सर्वच पक्षांतील नेते-कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
गांधी यांचे मंगळवारी दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर नगर येथेच अंत्यसंस्कार करावेत, अशी इच्छा नातेवाईक व नगरवासीयांकडून व्यक्त होत होती. दिल्ली येथून शववाहिकेतून त्यांचे पार्थिव नगरला आणण्यात आले. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्या मार्केट यार्डमागील राहत्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आले. तेथून अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. बुरुडगाव रस्तामार्गे मार्केट यार्ड चौक, बंगाल चौकी, गांधी यांचे जुने निवासस्थान, माणिक चौक, नगर अर्बन बॅंक चौक, नेता सुभाष चौक, भाजप कार्यालय, नालेगावमार्गे जाऊन अंत्ययात्रा अमरधाममध्ये पोचली. जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी (कै.) दिलीप गांधी यांचे पुत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. "अमर रहे, अमर हरे, गांधी साहेब अमर रहे', "जब तक सूरज चांद रहेगा, गांधी साहेब का नाम रहेगा' अशा घोषणा अंत्ययात्रेदरम्यान दिल्या जात होत्या.
दरम्यान, तीन वेळा खासदार, एकदा मंत्री असूनही माझ्या वडिलांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का झाले नाहीत, असा सवाल त्यांच्या कन्या स्मिता नवसारीकर यांनी उपस्थित केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.