नगर ः कोरोनामुळे काल अहमदनगर जिल्ह्यात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. सोशल मीडियात अॉक्सीजन संपल्याची आवई उठली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले होते.
काल मध्यरात्री दोन टँकर जिल्ह्यासाठी आले. त्यामुळे नगरकरांची चिंता काही प्रमाणात मिटली. १९ आणि १० टनांचे असे दोन टँकर काल दाखल झाले. त्यामुळे आज सकाळपासून अॉक्सीजन पुरवण्याचे काम सुरू झाले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अॉक्सीजन टँकर मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी ट्विट करून नगर जिल्ह्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह सर्वच मंत्री अॉक्सीजन टँकर मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर मध्यरात्री टँकर दाखल झाल्याने घोर मिटला.
आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल चर्चा केली. त्याचवेळी टँकर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. दोन टँकर मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी "ई-सकाळ"सोबत बोलताना दिली.
प्रादूर्भाव वाढल्याने रुग्ण संख्या वाढली आहे.. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे कठीण झालेले आहे. त्यातच भरीस भर आता जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाईन निर्माण झाल्याने शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांकडून ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून ऑक्सिजनची मागणी केली जात होती.
दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना आता ऑक्सिजनची आवश्यकता भासू लागलीय. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड कमी पडत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने भीतीचे वातावरण होते. शहरासह जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांच्या व्यवस्थापनाने जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा व्यवस्थापनाकडे करीत होते.
ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्यामुळे काही रुग्णालयांनी रुग्णांना तुम्ही तुमच्या जबाबदारीवर रुग्णांना दुसरीकडे हलवा, असा सल्लाही दिला जात होता. काहींनी तर रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णाला काही झाल्यास आमची जबाबदारी राहील, असा आशयाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्याचीही चर्चा शहरात सुरू होती.
या प्रकरणी समाजमाध्यमावरही चर्चा झडून प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठविली जात होती. दरम्यान, एका रुग्णालयाने रुग्णांना इतरत्र हलविण्यात यावे, ऑक्सिजन संपत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले होते. या संदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची चांगलीच झाडाझडती घेतली.
ऑक्सिजनचे महत्व पटले
जिल्ह्याला 60 केएलची ऑक्सिजनची आवश्यकता आहे. प्रशासनाने 40 केएल पुरवठा करण्याचे सूचित केले होते. परंतु त्यातील एकही केएल ऑक्सिजनचा दिवसभरात पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे.
- डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा शल्यचिकित्सक.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.