प्रयागराज (उत्तर प्रदेश) : राज्यात एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नवरी ऐवजी मुलीचा पुतळा होता. पुतळ्या मागचे कारण ऐकल्यानंतर अनेकांना धक्का बसत आहे.
प्रयागराज शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर घूरपूर भागातील भैदपूर गावात हा अनोखा विवाह पार पडला आहे. गावातील शिवमोहन पाल (वय 90) यांना नऊ मुले आहेत. यापैकी आठ मुलांचा विवाह झाला आहे. पंचराज हा नववा मुलगा. त्याच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू होती. विवाहाच्या दिवशी कुटुंबामध्ये उत्साहाचे वातारवरण होते. पंचराजच्या हातावर मेहंदी काढण्यात आली होती. नवीन कपडे घालून, त्याची मिरवणूक काढण्यात आली. घरापुढे मंडप टाकण्यात आला होता. महिलांनी लग्नाची गाणीही म्हटली. विवाहाला निवडक नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती. विवाहाचा मुहुर्त जवळ येऊन ठेपला आणि नवरदेव विवाहासाठी सज्ज झाला. नवरदेवासमोर एक युवतीचा पुतळा ठेवण्यात आला. मंगलाष्टके संपल्यानंतर पंचराजने पुतळ्याच्या गळ्यात हार घातला. शिवाय, पंचराजने पुतळ्यासोबत सात फेरेही घेतले आणि विवाह पार पडला.
विवाह मोठ्या धामधुमीत पार पडला आणि परिसरात त्याच्या विवाहाची चर्चा सुरू झाली. शिवाय, विवाहाची छायाचित्रे व्हायरल होऊ लागल्यानंतर अनेकजण मुलीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होते. पण, तो पुतळा होता. या विवाहामागचे कारण शिवमोहन यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, 'मी स्वत: उच्च शिक्षित असून, सरकारी नोकरी केली आहे. मुलांना चांगले शिक्षणही दिले. पण, पंचराज शिकण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तो अशिक्षितच राहिला. अशिक्षित असल्यामुळे त्याला कोणताही रोजगार मिळत नाही. त्यामुळे तो जनावरे सांभाळण्याचे काम करतो. अशिक्षित आणि बेरोजगार मुलाशी लग्न लावून एखाद्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नसल्यामुळे पुतळ्याशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि त्याला धडा शिकवला आहे.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.