नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकामुळं रद्द करण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सीबीएसईनं विद्यार्थ्यांच्या गुणनिश्चितीसाठी नवं धोरणं तयार केलं आहे. त्याचबरोबर या नव्या धोरणावर आधारित गुणांच्या आधारे जून महिन्यात याचा निकालही घोषित करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईनं एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा स्थगितीची घोषणा केली होती. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला होता. या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. दहावीची परीक्षा मे आणि जूनमध्ये होणार होती.
दहावीच्या विद्यार्थ्यांना नव्या धोरणानुसार गुण देताना प्रत्येक विषयासाठी २० गुण अंतर्गत मुल्यांकनासाठी तर ८० गुण सत्रादरम्यान झालेल्या परीक्षांच्या आधारे दिले जातील. त्यानंतर साधारण जूनच्या तीसऱ्या आठवड्यात याचा निकाल जाहीर केला जाईल.
अनेक राज्यांनी आधीच रद्द केल्या होत्या परीक्षा
सीबीएसईकडून दहावीची परीक्षा स्थगित करण्याच्या घोषणेपूर्वीच अनेक राज्यांनी आधीच परीक्षा रद्द केल्या होत्या. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्य बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. दरम्यान, अशाच प्रकारचा निर्णय घेण्यासाठी इतर राज्य सरकारेही विचार करत होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.