श्रीनगर ः बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे असल्याची टीका जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली. दरम्यान, ढगाळ हवामानाबाबतच्या विधानाची विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खिल्ली उडवीत मोदींवर टीका केली.
बालाकोटवरील हवाईहल्ल्याच्या वेळी भारतीय हवाई दलाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत खराब हवामानातही पंतप्रधान मोदी यांनी ही कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे निर्धारित लक्ष्यावर हल्ला करण्यात अपयश आले, अशी टीका मेहबूबा यांनी केली.
सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी हे विधान केले होते. बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी हवामान खराब असल्यामुळे कारवाईची तारीख बदलण्याची सूचना तज्ज्ञांनी केली होती. मात्र, पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे भारतीय विमाने पाकिस्तानी रडारवर दिसणार नाहीत, असा सल्ला देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते, असे मोदी म्हणाले होते. मोदींचे हे वक्तव्य भाजपच्या ट्विटर हॅंडलवरूनही ट्विट करण्यात आले होते. मात्र, त्याबद्दल टीका होऊ लागल्यानंतर संबंधित ट्विट हटविण्यात आले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही ट्विटरवर मोदींच्या विधानाची खिल्ली उडविली. मोदींच्या विधानावर सोशल मीडियातही प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.