न्यूयॉर्क : महत्त्वाच्या आणि व्यापारी ठिकाणांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर होण्याची शक्यता असून याकडे जागतिक समुदायाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आज सांगितले. जम्मूतील हवाई दलाच्या विमान तळावर दोन ड्रोन हल्ले झाले, त्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक व्यासपीठावर ही चिंता व्यक्त केली आहे.
जम्मूत झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अधिक सावध झालेल्या भारतीय लष्कराने दोन संभाव्य ड्रोन हल्ले परतवून टाकले. पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचे यामुळे दिसून आले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांनी आमसभेत सांगितले की, ‘‘सध्या सोशल मीडियासह विविध प्रकारच्या माहिती आणि तंत्रज्ञानाचा दहशतवादी कारवायांसाठी, कट्टरतावाद पसरविण्यासाठी आणि युवकांची दिशाभूल करण्यासाठी वापर केला जात आहे. आर्थिक व्यवहारांसाठीच्या नव्या डिजीटल माध्यमांचाही गैरवापर वाढला आहे. या सर्वांमध्ये आता ड्रोनद्वारे हल्ला करण्याची पद्धत वाढण्याची शक्यता आहे. ही बाब सर्वच देशांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे.’’
दहशतवाद- सध्याचे आणि भविष्यातील धोके, या विषयावर ते बोलत होते. ड्रोन बाजारात अत्यंत कमी दरांत आणि सहज उपलब्ध होत असल्याने दहशतवाद्यांकडून त्यांचा वापर वाढू शकतो. सध्याही माहिती गोळा करणे, शस्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करणे, हेरगिरी करणे या कारणांसाठी ड्रोनचा बेकायदा वापर होत असल्याचे दिसून आले आहे, असे कौमुदी यांनी सांगितले. संसर्गाच्या कालावधीत लोक अधिक काळ इंटरनेटवर व्यतीत करत असल्याने चिथावणीखोर माहितीला ते बळी पडू शकतात. त्यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालींवर अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक असल्याचा इशाराही कौमुदी यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.