मासिक पाळी हा विषय केवळ महिलांपुरताच मर्यादित नसून, तो गरोदरपण आणि मुलांच्या जन्माशी संबंधित असल्याने संपूर्ण मानवजातीशी निगडित आहे.
- विकास सिंह
Menstrual cycle : मासिक पाळी हा विषय केवळ महिलांपुरताच मर्यादित नसून, तो गरोदरपण आणि मुलांच्या जन्माशी संबंधित असल्याने संपूर्ण मानवजातीशी निगडित आहे. हा कालावधी अनेक महिलांसाठी कष्टाचा व काहींसाठी वेदनादायी असतो.
मात्र, या दिवसांत शरीरामध्ये नक्की काय बदल होतात, महिन्याचा हा कालावधी गरोदरपणा आणि मुलांच्या जन्माशी कसा जोडला गेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत रक्तस्राव का होतो? चला जाणून घेऊया
स्त्रीचे शरीर प्रत्येक महिन्याला गरोदरपणासाठी तयार होत असते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची यांसारखे हार्मोन्स मासिक पाळी नियंत्रित करतात. यामध्ये प्रथम गर्भाशयामध्ये असलेल्या भिंती जाड केल्या जातात. या जाड झालेल्या भिंतीवरच फलित झालेली अंडी जाऊन बसतात.
गरोदरपणाच्या स्थितीमध्ये गर्भधारणा फालोपेन ट्यूबमध्ये होते आणि नंतर ही अंडी झायगोट (युग्मनज, बहुपेशीय रचना) वेगळी होऊन मोठ्या संख्येने वाढतात आणि गर्भाशयातील जाड भिंतीला जाऊन चिकटण्यासाठी तयार होतात.
गर्भधारणा न झाल्यास ही भिंतीला चिकटलेली अंडी रक्ताबरोबर योनीद्वारे बाहेर पडतात. अशाप्रकारे मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव होतो व तो ५ ते ७ दिवसांपर्यंत कायम राहातो. मात्र, मासिक पाळीचे संपूर्ण चक्र २८ दिवस चालते व ते चार टप्प्यांत पार पडते.
मासिक पाळीचे ४ टप्पे
मेनस्ट्रुअल, फॉलिक्युलर, ओव्ह्युलेशन आणि ल्युटेल हे मासिक पाळीचे चार टप्पे आहे. यांचे नियंत्रण विविध हार्मोन्सद्वारे (संप्रेरक) केले जाते व त्यांद्वारे गर्भारपण आणि मासिक पाळी नियंत्रित होते.
मेनस्ट्रुअल या टप्प्यात रक्तस्राव होतो. अंडी फलित न होता तेथेच राहतात व त्यामुळे इस्ट्रोजनची पातळी खालावते.
फॉलिक्युलर या टप्प्यात अपरिपक्व अंडी कुपीमध्ये राहतात आणि वाढतात. दुसरीकडे इस्ट्रोजेन अंड्यांची वाढ आणि गर्भाशयाच्या भिंतीला जाड करण्यात मदत करते. हा कालावधी सुमारे १६ दिवसांचा असतो व त्या दरम्यान रक्तातील इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते. इस्ट्रोजेनच्या वाढलेल्या प्रमाणामुळे तुम्हाला आनंदी वाटते.
ओव्ह्युलेशन या टप्प्यात इस्ट्रोजेनच्या वाढलेल्या प्रमाणामुळे अचानक ल्यूटीनाइझिंग हे हार्मोन बाहेर सोडले जाते व हे साधारण मासिक पाळीच्या १३व्या दिवशी घडते. यामुळे अंडी परिपक्व होता आणि ती फॉलिकल (ग्रंथी) व अंडाशयातून बाहेर पडतात. येथे ही अंडी अंडनलिकेपर्यंत (फॅलोपियन) खाली जातात व शुक्राणुद्वारे फलित होण्याची वाट पाहतात. हा २८ दिवसांच्या पाळीपैकी १४वा दिवस असतो आणि तो गर्भार राहाण्यासाठीचा सर्वांत महत्त्वाचा काळ समजला जातो.
ल्युटेल या टप्प्यात अंड्यात साठवलेल्या फॉलिकल पेशींच्या गोळ्यात परावर्तीत होता. त्यातून प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते, ज्याद्वारे गर्भाशयामध्ये ही अंडी चिकटून राहण्यास मदत होते. जर गर्भधारणा झाली नाही, तर हा पेशींचा गोळा आक्रसतो, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनची पातळी खालावते व त्यामुळे मासिक पाळी येऊन रक्तस्राव होतो. योग्य पोषणमूल्यांद्वारे या कालावधीत शरीराची होणारी हानी भरून काढता येते.
मासिक पाळीदरम्यानचा आहार
फळे आणि हिरव्या पालेभाज्या ः मासिक पाळीदरम्यान शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे चक्कर व भोवळ येते. पालक, ब्रोकोली या गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या लोहाचा समृद्ध स्रोत आहेत. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअमचे विपुल प्रमाण असलेला आहार घेणे, तसेच आहारात दूध, तीळ आणि अंड्याच्या समावेशामुळे हा त्रास होत नाही. संत्री, द्राक्षे, बेरी आणि डाळिंब या फळांचा आहारातील समावेशही फायद्याचा ठरतो.
पाणी ः पाळीदरम्यान हार्मोन्समध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व त्याच परिणाम चयापचय क्षमतेवर होतो. त्यामुळे पोटात गोळे येणे व मलावरोधाचा त्रास जाणवतो. हा त्रास पाणी प्यायल्यामुळे कमी होतो.
मासे ः रावस आणि ट्युनासारख्या ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे विपुल प्रमाण असलेले मासे आहारात घेतल्याने पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि चिडचिडेपणा कमी होतो.
सुकामेवा ः ओमेगा ३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन इ आणि प्रोटिन्सचे अधिक प्रमाण असलेल्या सुकामेव्याचा समावेश आहारात करावा. बदाम हा मॅग्नेशिअमचा मोठा स्रोत आहे व त्यामुळे डिसमेनोरियाची लक्षणे कमी होतात.
डार्क चॉकलेट ः हा मॅग्नेशिअम व लोहाचा मोठा स्रोत आहे व त्यामुळे सेरोटोनिस या आनंदी ठेवणाऱ्या हार्मोन्सची पातळी वाढते.
या काळात आहारात आल्याचे समावेश करा, अल्कोहोलचे प्रमाण शून्य ठेवा व अतिप्रमाणात साखर व मीठ अधिक असलेले, मसालेदार पदार्थ, दही, आइस्क्रीम, शीतपेये टाळा. त्यामुळे पाळीदरम्यान डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या आदी त्रास होणार नाहीत. त्याऐवजी भाज्यांचे सूप, ग्रीन टी यांचा आहारात समावेश करा.
व्यायाम ः मासिक पाळीच्या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी खूपच खालावलेली असते. त्यामुळे थकवा व अंगात ऊर्जा नसल्याचे जाणवते. मात्र, या काळात व्यायाम केल्यास तो फायद्याचा ठरतो. त्यातून तुमचा मूड सकारात्मक होतो, रक्ताभिसरण वाढते, थकवा कमी होतो व ऊर्जेची पातळी वधारते.
व्यायामातून एन्डोर्फिन नैसर्गिकरीत्या वाढते व ते नैसर्गिक वेदनाशामक असल्याने पेटक्यांचे प्रमाण व पाठीचे दुखणे कमी होते. तुमची मासिक पाळी अनियमित असल्यास व्यायामाने ती नियमित होते. वजन नियंत्रणात राहिल्याने हार्मोन्सचे संतुलन कायम राहाते. फार कष्टदायक व्यायाम न करता चालणे, योगासने आणि एरोबिक्ससारखे व्यायाम करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.