जळगाव : कोरोना व्हायरसची अगोदरच भीती आहे. यात कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे होऊन गेल्यानंतरदेखील अनेकांमध्ये काही लक्षणे आढळून येतात. अशाच एका आठ वर्षांच्या मुलीचा कोरोना आजाराच्या गुंतागुंतीमुळे जीव धोक्यात आला होता. मात्र, बालरोगतज्ज्ञ डॉ. शास्त्री व डॉ. भोसले यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांचा सल्ला घेत मुलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
जळगाव तालुक्यातील आठ वर्षांची मुलगी डॉ. अजय शास्त्री यांच्या अंकुर मुलांचे हॉस्पिटल येथे उपचार घ्यायला आली. तिच्यावर निदान करण्यास सुरवात केल्यानंतर कोविडमुळे झालेल्या गुंतागुंतीने तिची प्रकृती गंभीर होत आहे. यानंतर त्या मुलीला चिरायू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यादरम्यान तिचा रक्तदाब कमी झाला होता. शिवाय हृदयाचे स्नायू आजारामुळे कमकुवत झाले होते. रक्त गोठण्याच्या पद्धतीतही अडचण झाली होती. अशा परिस्थितीत तिच्यावर सर्व डॉक्टरांनी कठोर मेहनत घेऊन तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. डॉ. अविनाश भोसले, डॉ. सारिका सुरवाडे, डॉ. सारिका पाटील, डॉ. स्वप्नील दसोरे, डॉ. प्रवीण बोदडे, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. मृणालिनी पाटील यांनी मुलीवर यशस्वी उपचार केले.
जगातही असे चित्र
डॉक्टरांनी जगाचा आढावा घेतला असता असे आढळले आहे, की प्रत्येक देशात लहान मुलांमध्ये कोविडचे रुग्ण त्या देशातील प्रौढ लोकांच्या कोविड साथरोगापेक्षा काही आठवड्यांनंतर आढळले आहेत. त्यामुळे आपल्या भागातदेखील असे रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. आजार नवीन असून, उपलब्ध केसेस कमी असल्यामुळे असे रुग्ण उपचार करताना बऱ्याच अडचणीदेखील येण्याची शक्यता आहे.
लहान मुलांबाबत आहे गैरसमज
या आठ वर्षांच्या बालिकेच्या प्रकरणात उपचारांमध्ये आलेल्या अडचणींना पार पाडत चिरायू हॉस्पिटलच्या टीमने या दुर्मिळ आजारावर मात केली. लहान मुलांना कोरोनाची लागण होत नाही. शिवाय झाली तरी त्यात लक्षणे फारच किरकोळ असतात आणि त्यात लहान मूल अत्यवस्थ स्थितीत जात नाही, असा गैरसमज समाजात आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञ जेव्हा रुग्णाच्या नातेवाइकांना कोविडची तपासणी करायला सांगतात त्या वेळी नकार दिला जातो. अत्यवस्थ झालेले बहुतांश रुग्ण निदान आणि उपचार पद्धतीमध्ये उशीर झालेले असतात. त्यामुळे जळगाव बालरोगतज्ज्ञ संघटनेने लोकांना लक्षण दिसल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांनी सांगितल्याबरोबर कोविड आणि संबंधित आजारामुळे झालेल्या शरीरातील इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी आवश्यक तपासण्या करून घ्याव्या, असे आवाहन केले आहे.
तीन-चार आठवड्यांनंतर दिसतात लक्षणे
कोरोनाग्रस्त झाल्याच्या तीन ते चार आठवड्यांनंतर काही लहान मुलांमध्ये पुन्हा तीव्र ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, डोकेदुखी व अंगदुखी, रक्तदाब कमी झाल्याने सुस्त होणे, लिव्हर, किडनी किंवा मेंदूमध्ये ताप जाणे अशी विविध प्रकारची लक्षणे दिसतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी योग्य खबरदारी प्रत्येक पालकाने घेण्याचे आवाहन डॉ. अजय शास्त्री यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.