औरंगाबाद - येथील घाटी रुग्णालयात रोज शेकडो गरजू रुग्ण येतात. त्यांच्यासोबत असलेल्या नातलगांना बऱ्याचदा उपाशीपोटी झोपावे लागते. प्रसंगी ॲडमिट नसलेल्या रुग्णांनाही पैशाअभावी दिवसभर उपाशी राहावे लागते. त्यांच्या सोयीसाठी सकल जैन समाज, भगवान महावीर जन्मकल्याणक समिती आणि जैन ॲलर्ट ग्रुपतर्फे आता वर्षभर एकवेळचे मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय टळणार आहे.
घाटी रुग्णालय गरिबांचे रुग्णालय म्हणून ख्यातीप्रात आहे. त्यामुळेच मराठवाड्यासह खानदेश आणि पश्चिम विदर्भातील अडले-नडले शेकडो रुग्ण येथे रोज उपचारासाठी येतात. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही असतात; पण येथे आल्यानंतर रुग्णांसोबत असलेल्यांच्या जेवणाची आबाळ होते. बऱ्याचदा केवळ तपासणीसाठी आलेल्या अनेक रुग्णांनाही आर्थिक अडचणीमुळे पोटभर जेवण करता येत नाही. असे होऊ नये, यासाठी सकल जैन समाजाने पुढाकार घेत येथे हनुमान जयंतीपासून आता वर्षभर एकवेळचे मोफत अन्नछत्र सुरू केले आहे.
आठ ते दहा संघटना करतात अन्नदान
घाटी आणि शासकीय कर्करोग रुग्णालयात रोज आठ ते दहा संस्था आणि संघटना गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अन्नदान करतात. आता सकल जैन समाजाने सुरू केलेले अन्नछत्र मोबाईलस्वरूपात राहणार आहे. त्यासाठी सकल जैन समाजाचे एक वाहन घाटी परिसरात रोज उभे असेल. या वाहनातून सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जेवणाचे पार्सल दिले जाणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.