चिपळूण ( रत्नागिरी ) - जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूका भाजप स्वबळावर लढवणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी होईल किंवा नाही माहिती नाही. पण भाजप जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. त्यासाठी गावपातळीवर बैठका सुरू आहेत. उमेदवारांची चाचणी केली जात आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जनतेची गेली अनेक वर्षे फसवणूकच केली. सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही हाच कित्ता गिरवला आहे. त्यामुळे जनता पर्यायाच्या शोधात आहे. भाजप मतदारांना पर्याय देणार असून ग्रामीण भागातही पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे डॉ. नातू यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या कृषी विधेयकाचे समर्थन करताना डॉ. नातू म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारांनी लोकसभा तसेच विधानसभेत आपले मत मांडले नाही. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. संसदेच्या बाहेर कृषी विधेयकाला विरोध करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे याची तरतूद सरकारने केली नव्हती. शेतकऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेतून सरकारने हमीभाव देण्याचे मान्य केले आहे. तरीसुद्धा आंदोलन सुरू आहे. त्यामागे वेगळे राजकारण असू शकते. कृषी कायदा कोकणच्या हिताचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.