कोकण

सावधान! अरबी समुद्रातील वादळे वाढणार

राजेश कळंबटे

रत्नागिरी : ‘‘समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले की कमी हवेचा दाब तयार होतो. ती परिस्थिती अरबी समुद्रात गेल्या दोन वर्षांत वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे वादळांना दरवर्षी तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम किनारपट्टीवरील जीवनमानावर होणार आहे,’’ अशी भीती हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केली. वादळाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

बंगालच्या उपसागरातील वादळे पूर्व किनाऱ्यासाठी धोकादायक ठरतात. आता पश्‍चिमेकडील वादळे पश्‍चिम किनारपट्टीला धोक्‍याची ठरली आहेत. ही परिस्थिती भविष्यात कायम राहणार असून अरबी समुद्रातील वादळांना दरवर्षी तोंड द्यावे लागणार आहे. कोकण किनारपट्टीतील वास्तव्य धोक्‍याच्या रेषेवर असल्याचे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘पाण्याचे तापमान वाढल्याने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. सध्या सर्वसाधारणपणे ९९२ हॅप्तापास्कल हवेचा दाब आहे. त्याच्याभोवती १ हजार, १००२ हॅप्तापास्कल दाब तयार होतो. कमी दाबाच्या पट्ट्याबरोबर गोल-गोल वारे तयार होतात. त्यालाच चक्रीवादळ (सायक्‍लॉन) म्हणतात. याच पद्धतीने अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होते. ही वादळे कमी दाबाच्या दिशेने पुढे सरकतात. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता क्‍यार, महा यांसह निसर्ग अशी चक्रीचादळे अरबी समुद्रात तयार होत आहेत. त्यातील निसर्ग वादळ तर भूपृष्ठावरून पुढे सरकत गेले.

अनुकूल हवामान, समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान अरबी समुद्रात असल्याने वादळं तयार होतात. अशी चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात नेहमीच होतात; पण अरबी समुद्राचे गेल्या दोन वर्षातील रेकॉर्ड पाहता वादळाच्या घटना वारंवार घडत असल्याने हा हवामानातील बदल आहे. परिणामी चक्रीवादळ, गारपीट, दुष्काळ किंवा अतिवृष्टी होत आहे. ऑक्‍टोबर महिन्यात पाऊस पडल्यानंतर पुढे प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावली. मे महिन्यात उच्चांक गाठला.’’

आर्थिक अडचणीत भर

डॉ. साबळे म्हणाले, ‘‘घरे पडणे, विजेचे खांब पडणे, झाडांचे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे कोकणवासीयांच्या राहणीमानात अडचणी येत आहेत. मनुष्यहानी, वित्तहानी, जनावरे, मालमत्ता, फळबागा, रस्त्यांची हानी वादळामुळे कोकणात होतेय. त्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडणार असून जीवनमान बदलून जाईल. चक्रीवादळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्याची तीव्रता किती राहील, या दृष्टीने लोकांचे स्थलांतर करणे, नुकसानभरपाई देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल.’’

किनारी लोकवस्त्यांना धोका

जागतिक स्तरावर बदल नोंदले जात असून, सरासरी तापमान ०.८ अंश सेल्सिअसने वाढत आहे. बर्फ वितळण्याचे प्रमाण २६७ गिगाबाईटस्‌ इतके आहे. परिणामी समुद्राची पाणीपातळी ९ इंचाने वाढली. सध्या अंटार्क्टिका येथे महाकाय बर्फाचा तुकडा तयार झाला आहे. तो वितळत असल्याने समुद्रकिनारी वस्त्यांना धोका निर्माण झाला असून, त्यात मुंबईचा समावेश आहे. हाच वातावरणातील बदल अरबी समुद्रातील वादळालाही कारणीभूत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT