रत्नागिरी - भाजप नेत्यांचा अबोला कायम राहील्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यापुढील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकरांचे सनातन प्रभातशी असलेल्या संबंधावरुन वातावरण कलुशीत झाले आहे. याचा फायदा स्वाभिमानचे निलेश राणे कसे उठवणार याकडेच सर्वांच लक्ष लागले आहे.
मागील आठवडा उलटसुलट राजकीय घडामोडींचा ठरला. शिवसेना-भाजप युतीतील नेत्यांचे मनोमिलन गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या निधनामुळे लांबले. नेरुळ येथील युतीच्या नेत्यांची सभा स्थगित झाली; परंतु पुढील तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची शिवसेनेच्या प्रचाराकडे अजुनही पाठच आहे.
मुख्यमंत्री-पक्षप्रमुखांच्या संयुक्त मेळाव्यापेक्षा थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी खासगी भेटीची प्रतिक्षा रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील भाजप नेत्यांना आहे. ती झाली नाही तर कदाचित मनाने भाजप नेत्यांचा विरोध कायम राहील अशी अटकळ बांधली जात आहे. यावर तोडगा वेळीच निघाला नाही तर शिवसेनेच्या राऊतांपुढे आव्हान राहील. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे पाच आमदार असल्यामुळे राऊतांचे पारडे जड दिसते.
युतीचे दुरावा नाट्यापाठोपाठ काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर सनातन प्रभात संस्थेशी निगडीत असल्याचा आरोपात सापडल्याने गदारोळ सुरु झाला. गेले तीन दिवस यावर खल सुरु असून आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्याने काँग्रेसकडून उमेदवार बदलाची तयारी सुरु झाली. रमेश कीरांचे नावही पुढे आले; मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी बांदीवडकरांसाठी आग्रह धरला असून थेट केंद्रीय समितीकडे धाव घेतली. सध्या बांदीवडकरना अभय मिळाला तरी आयत्या वेळी काहीही होऊ शकते असे काँग्रेसमधील जाणकारांचे मत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह स्वतः नीलेश राणेंनी चांगली आघाडी सांभाळली आहे. त्यांना राजापुर, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातील मते मिळवावी लागतील. सध्याच्या राजकीय गोंधळाचा फायदा त्यांना उठवावा लागणार आहे. शिवसेनेच्या काही स्थानिक पातळीवरील नेत्यांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युती, आघाडीमध्ये सुरु असलेल्या गोंधळावरच स्वाभिमानचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. सध्या कोकणात शिमगोत्सवाचे वातावरण असल्यामुळे खर्या अर्थाने प्रचाराची राळ उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच उठणार हे निश्चित आहे.
28 पासुन अर्ज भरणा
उमेदवारी अर्ज भरण्याला 28 मार्चपासुन सुरवात होत आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत हे 30 मार्चला, स्वाभिमानचे नीलेश राणे 29 मार्चला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच काँग्रेसकडून पुर्वी जाहीर केल्या प्रमाणे त्यांचा उमेदवार 30 मार्चलाच अर्ज भरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.