रत्नागिरी - आगामी ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. याबाबत तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उद्या (ता. 19) समन्वय समितीची बैठक होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार असल्याने 479 ग्रामपंचायतींपैकी साडेचारशे ग्रामपंचायतीत आमचा विजय होईल, असा आत्मविश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
पाली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, उद्या होणाऱ्या महत्वाच्या बैठकीत तिकीट वाटपाबाबत चर्चा होणार आहे. भविष्यातील वाटचालीबाबत विचार जाणून घेतले जाणार आहेत. जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांबाबत विशेषत: चर्चा होणार आहे. यामध्ये जिल्हा नियोजन, संजय गांधी निराधार योजना, दक्षता समिती, विशेष कार्यकारी अधिकारी पदे यावर तीनही पक्षातील पदाधिकारी चर्चा करून, पक्षाच्या वरिष्ठांना याबाबत अहवाल देणार आहेत. त्यानंतर महिन्यातच या कमिट्या जाहीर केल्या जाणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक व समित्यांबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत शिवसेनेकडून मी पालकमंत्री ऍड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, योगेश कदम, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर शिंदे, दोन्ही जिल्हाप्रमुख, शशिकांत चव्हाण, नेहा माने, सुभाष बने असणार आहेत. राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अजित यशवंतराव, माजी आमदार संजय कदम, रमेश कदम, कुमार शेट्ये, बशीर मुतुर्झा तर कॉंग्रेसकडून माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले, अविनाश लाड, दीपक राऊत यांची समन्वय समितीची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयाबाबत प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांना याची माहिती देऊन पुढील निर्णय घेणार आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असल्याने 90 टक्केच्या वर ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे असतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.