सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्यात मेमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळ तर 3 जूनला झालेल्या मॉन्सूनपूर्व वादळी पावसात तालुक्यातील एकुण 22 हेक्टरमधील फळपिकांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, केळी या लागवडीखालील फळ पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
निसर्ग वादळात 123 शेतकऱ्यांचे 16 हॅक्टर लागवडी खालील क्षेत्राचे जवळपास 2 लाख 88 हजार रुपयांचे तर जूनमध्ये वादळी वाऱ्यामुळे 52 शेतकऱ्यांचे साडेसहा हॅक्टर क्षेत्राचे 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही ही वादळामुळे झालेल्या फळपीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, यासाठी तालुका कृषी विभागातर्फे तहसील कार्यालयामार्फत शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.
तालुक्याला दोन चक्रीवादलाचा चांगलाच फटका बसला आहे. मे मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादलामुळे तालुक्यात फळपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर जूनमध्ये आलेला अवेळी पाऊस तसेच वादळी वाऱ्याने देखील फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळात पावसाचा देखील मोठा जोर होता. त्यामुळेही पिकांची मोठी हानी झाली आहे. मेमधील आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील बांदा, तांबोळी, वाफोली, असनिये तर काही प्रमाणात ओटवणे भागात आंबा, काजू, नारळ, सुपारी, केळी या लागवडीखालील फळ पिकांचे नुकसान झाले आहे.
या वादळाचे पंचनामे कृषी विभागाकडून केले आहेत. तर अन्य काही भागातील पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या भागातील 123 शेतकऱ्यांचे 16 हेक्टर क्षेत्रातील जवळपास 2 लाख 88 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जूनमध्ये सुरवातीला आलेल्या वादळी वाऱ्यासहित अवेळी पवासामुळे तालुक्यातील सांगेली, कलंबिस्त पंचक्रोशीत फळपिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कृषी विभागाने युद्धपातळीवर या भागातील केलेल्या नुकसानीचे पंचनाम्यांमध्ये एकूण साडे सहा हेक्टर लागवडी खालील क्षेत्राचे 52 शेतकऱ्यांचे 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागामार्फत दोन्ही वादळातील झालेल्या फळपिकांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे केले आहेत.
भरपाई वाटप, काही बाकी
शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठीचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. तेथून तो शासनाला पाठवले जाणार आहे. गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या फळपिक भरपाईचे तहसीलदार कार्यालयामार्फत नुकतेच वाटप केले आहे. चालू वर्षी चक्रीवादळामुळे झालेल्या फळपिक भरपाईचे वाटप होणे बाकी आहे.
संपादन ः राहुल पाटील
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.