कोकण

विंधन विहिरींचा उपाय खुंटला

सकाळवृत्तसेवा

टंचाईचे सावट गडद - टॅंकरमुक्‍ती वरवरची; २० हजार लोक तहानलेलेच

रत्नागिरी - उन्हाचा कडाका वाढत असतानाच जिल्ह्यातील पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. सध्या ५४ गावांतील ९३ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. टॅंकरला विंधन विहिरींचा पर्यायी मार्ग असतो; परंतु विंधन विहिरी खोदण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने हा मार्गही खुंटला आहे. शासनाने खोदकामासाठीचा दर ३४८ रुपये केलेला आहे. तरीही शासकीय कामांकडे कंत्राटदार वळलेले नाहीत. टंचाईची तीव्रता वाढत आहे, मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे टंचाई निवारण उपाययांचीही टंचाईच आहे.

रत्नागिरी, राजापूर तालुक्‍यांमध्ये टॅंकर सुरू करण्यापेक्षा पाण्याची पर्यायी व्यवस्था करून दिली गेली. त्यामुळे हे दोन्ही तालुके आजच्या घडीला टॅंकरमुक्‍त आहेत. 

गतवर्षी आजपर्यंत ४४ गावांमधील ७५ वाड्यांना ८ शासकीय व २ खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढली आहे. वाढलेल्या उष्म्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. अनेक विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. 

धनगरवाड्यांमध्ये तर बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. टंचाईसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीही तेवढे गंभीर दिसत नाहीत. जिल्ह्यातील २० हजार लोक टंचाईने बाधित आहेत.

जिल्ह्याचा टंचाई आराखडा पावणेतीन कोटी रुपयांचा बनविण्यात आला आहे. त्यात ९५ विंधण विहिरींचा आराखडा तयार केला आहे. एका विंधन विहिरीला ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. शासनाकडून खोदकामाला ३०१ रुपये दर दिला जातो. तो कमी असल्याने अनेक वेळा मशीन कंत्राटदार ही कामे करण्यास नकार देतात. तो दर वाढवूनही सध्या शासकीय कामांना कंत्राटदार मिळत नाहीत. ही दरवर्षीची ओरड आहे. 
विंधन विहिरी खोदकामाला कंत्राटदार मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. मे महिन्याचा उन्हाळा तेवढाच कडक राहण्याचा अंदाज आहे. त्या कालावधीत टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक वाढेल, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे विंधण विहिरींची कामे लवकरात लवकर सुरू करणे अत्यावश्‍यक आहे. अन्यथा जिल्ह्यातील स्थिती गंभीर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

विंधन विहिरी खोदकामासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती; परंतु पहिल्यावेळी त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात कंत्राटदार तयार होतील अशी अपेक्षा आहे.
- बी. एन. थोरात, पाणीपुरवठा अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT