सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील तालुक्यामध्ये गेले दोन दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील भातशेती आडवी झाली आहे. तालुक्यातील न्हावेली- रेवटेवाडी व पाडलोस भागांतील भातशेती आडवी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या घासाचा चिखल झाल्याने शेतकरी खचला आहे.
यंदा सरासरीपेक्षाही चांगला पाऊस झाल्याने बळीराजा आनंदात होता तसेच योग्य प्रमाणात समाधानकारक काही पाऊस झाला. त्यानंतर दरम्यानच्या काळात मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने काही ठिकाणची भातशेती पाण्याखाली गेली होती. मोठे नुकसान झाले नव्हते; मात्र आता ऐन हंगामात परिपक्व झालेली भातशेती गेल्या दोन दिवसांच्या पावसामध्ये अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
यंदा सरासरीपेक्षा शेतीचे जास्त उद्दिष्ट लागवडीखाली आणले गेले; मात्र आता कोसळणारा पाऊस या भागात शेतीला पूर्णतः मारक ठरत आहे. बळीराजाने मोठ्या कष्टाने पिकवलेली शेती परिपक्व झालेली असताना पावसामुळे आडवी होत आहे. जिल्ह्यात येथील तालुक्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस गेल्या दोन दिवसांपासून पडत आहे.
...तर आणखी नुकसान शक्य
तालुक्यातील न्हावेली-रेवटेवाडी या ठिकाणी भातशेतीत गवे हैदोस घालत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यातच मुसळधार पावसाचा फटका, यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशा स्वरूपाचा आणखी पाऊस झाल्यास या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संपादन - राहुल पाटील
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.