74041
कणकवली ः कवयित्री सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. श्रीपाल सबनीस. शेजारी उषा परब, डॉ. विशाल इंगोले आदी.
‘राखायला हवी निजखूण’मधून विवेकी विद्रोहाची पेरणी
डॉ. श्रीपाल सबनीस ः कवयित्री पवार यांच्या काव्यसंग्रहाचे कणकवलीत प्रकाशन
कणकवली,ता. ८ ः स्त्री मुक्तीपासून मानव मुक्तीचा प्रवाह कवयित्री सरिता पवार यांच्या कवितेत प्रकर्षाने दिसतो. आत्मभान जपतानाच समाजभान जपणारी आणि दुःखमुक्त मानवता शोधणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. ‘राखायला हवी निजखूण’ हा काव्यसंग्रह विवेकी विद्रोहाची पेरणी करणारा असून महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा काव्यसंग्रह म्हणून तो नावारूपाला येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
कवयित्री पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या राजगृह प्रकाशनने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कणकवली कॉलेज च्या एच.पी.सी.एल.सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादिका गीताली वि.म., साहित्य संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या उषा परब, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य डॉ. विशाल इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक, राजगृह प्रकाशनचे राजवैभव शोभा रामचंद्र, शुभांगी पवार, पत्रकार राजन चव्हाण उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सदाशिव पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. सबनीस म्हणाले की, पवार यांच्या कविता प्रगल्भ स्त्रीवादी असून सर्व पुरुषविरोधी नाहीत. अभिव्यक्तीचे रिंगण महत्वाचे हे अधोरेखित करताना संकुचित आणि पक्षपाती पुरुषी आदर्शाना धुडकावून स्त्रीत्वाचा आवाज बुलंद करणे महत्वाचे आहे. रामायणातील राम-लक्ष्मण बंधुप्रेम लोकप्रिय आहेच; परंतु सीतेचा त्याग आणि उर्मिलेच्या मनातील विरहाच्या स्पंदनाची दखल भारतीय संस्कृतीने घेतलेली नाही. सरिता पवार यांनी आपल्या कवितांतून सीतेला अग्नीपरिक्षा द्यायला लावणाऱ्या पुरुषी अहंतेचेही प्रतीक असणाऱ्या रामाचे देवत्व नाकारत आजच्या युगात स्त्रीपुरुष समानतेचा धागा गुंफला आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गीताली वि. म.म्हणाल्या की, या काव्यसंग्रहातील कवितांची भाषा सोपी, प्रवाही आणि आशयघन आहे. भाषा आणि संस्कृतीचे नाळेचं नातं असतं. समूहाची संस्कृती भाषेला जिवंत ठेवते. स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव, आणि सामाजिक न्यायाचा परिवर्तनशील विचार या काव्यसंग्रहातून व्यक्त होतो. प्रा. उषा परब म्हणाल्या की, ‘‘अल्पावधीत खूप प्रगल्भ झालेल्या काव्यलेखनाने पवार यांनी मराठी साहित्यविश्वाला आपली ओळख करून दिली आहे. साहित्यविश्वात त्यांनी घेतलेली स्वयंसिद्ध भरारी कौतुकास्पद आहे.’’ अभिनेते निलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. राजन चव्हाण यांनी आभार मानले.
--
काही मान्यवरांची मनोगते
डॉ. विशाल इंगोले म्हणाले की, ‘‘समाजात सध्या सामाजिक तेढ वाढत चाललेली असताना माणुसपणाला सोबत घेऊन जाणारी कविता हे पवार यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य आहे.’’ कवयित्री पवार म्हणाल्या, ‘‘दैनंदिन जीवनातील अनुभव आपसूकच कवितारुपात प्रतिबिंबित झाले. स्वतःचे अस्तित्व म्हणजे निजखूण. हीच निजखूण काव्यरूपाने या काव्यसंग्रहात व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.