कामे रखडली; पावसाची प्रतीक्षा
देवगडमधील शेतकरी चिंतेत; कडक उन्हाच्या झळांमुळे पिके अडचणीत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ ः तालुक्याच्या किनारी भागात पावसाने सध्या ओढ दिली आहे. कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे १५०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत तालुक्यात घरे आणि गोठे मिळून ११ लाख १० हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या शेतीसाठी दिवसाकाठी एखादी पावसाची सर पडते. दरम्यान, आणखी पाऊस शिल्लक असल्याने तो कधी बरसणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
यंदाचा पावसाळी हंगाम मेपासूनच सुरू झाला. त्यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली असली, तरी आंबा हंगामाच्या दृष्टीने अडचणीचे ठरले. सुरुवातीच्या पावसावेळी वीज पडून तालुक्यात दोन बैल दगावण्याचा प्रकार घडला होता. सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरल्याने आतापर्यंत पावसाने १५०० मिलिमीटरची आकडेवारी पार केली आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात २४ घरांचे मिळून सुमारे ७ लाख ८९ हजार, ७ गोठ्यांचे मिळून सुमारे ३ लाख २१ हजार ७०० रुपये असे एकूण सुमारे ११ लाख १० हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीची महसूल यंत्रणेने माहिती घेतली आहे. तसेच झाडे उन्मळून पडणे, आवारभिंती कोसळण्याचेही प्रकार घडले. सुरुवातीपासूनच पावसाने दमदार एंट्री मारल्याने आतापर्यंत नुकसानीची आकडेवारीही सुमारे ११ लाखांच्या बाहेर गेली आहे. सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतीकामाला वेळेआधी सुरुवात झाली; मात्र गेले काही दिवस पावसाने ओढ दिली आहे. कडक ऊन पडत असल्याने वातावरणातील उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. अधूनमधून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळतो. त्यामुळे शेतीसाठी सध्यातरी पाऊस कमी पडत नसल्याचे चित्र आहे; मात्र आता विश्रांती घेऊन नंतर अचानक जोराचा पाऊस बरसेल, अशी शक्यताही शेतकरी वर्तवित आहेत.
......................
उपलब्ध पाण्यात लावणीची कामे
तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्या लावणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे खरंतर जोराचा पाऊस अपेक्षित असतो. मात्र, तरीही शेतकरी उपलब्ध पाण्यात शेतीची कामे उरकून घेत आहेत. काहींनी भात लावणीबरोबरच नाचणी लागवडही केली आहे. नाचणीला कमी प्रमाणात पाऊस असल्यास चालतो. तालुक्याचा किनारी भाग कातळाचा असल्याने पाणी साठवण क्षमता कमी पडते. त्यामुळे लावणीच्या वेळी पाऊस असल्यास सोयीचे ठरते, असे शेतकरी सांगतात.
........................
खत फवारणीसाठी पावसाची आवश्यक
तालुक्यात भातशेतीसह आंबा कलमांना खते देण्याची कामेही सुरू आहेत. पाऊस कमी असल्याने कामाला वेग आला आहे. मात्र, खते दिल्यानंतर पाऊस अपेक्षित असतो. सद्यःस्थितीत पावसाचे प्रमाण मात्र कमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.